डोळखांब : शहापूर तालुका हा भौगोलिकदृष्टया अतिशय दुर्गम व डोंगराळ तालुका असून दर्याखोर्यांनी व्यापलेला मोठा तालुका आहे. येथील निवडणूक विभागाच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घोळ दिसत असून येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष जागेवर जाऊन दुबार मतदारांचा सर्र्व्हेे होणार असल्याचे तालुका निवडणूक विभागाकडून सांगितले जाते.
2011च्या जनगणनेनुसार 3 लाख 34 हजार येवढी लोकसंख्या आहे. तर वाडा तालुक्यातील 50 हजार मतदार वगळता 2 लाख 76 हजार एवढी मतदार संख्या आहे. या मध्ये ग्रामपंचायत, पं. स., जि. प, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत 18 वर्षावरील मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू असते. ही नोंदणी मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळी प्रत्येक निवडणुकीत बोगस मतदानाचे प्रमाणही तितकेच मोठे असते.
यामध्ये बोगस, खोटे, मयत व्यक्ती, तसेच एकाच व्यक्तीची तालुक्यात दोन दोन ठिकाणी आणी इतर ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट असतात. यापैकी 326 पुलिंगवर हे प्रकार सर्रास सुरू असतात. मात्र याबाबत कुणी तोंड उघडायला तयार नाहीत.
अशा परिस्थितीत या सर्व प्रकाराबाबत तालुक्यातील 110 ग्रामपंचायत तसेच 15 जि.प.गट.30 पं.स.गणामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन घरटी तपासणी केली जाणार असून सदरील मतदार एकदा दोनदा मूळ पत्यावर आढळून आला नाही, तर त्याचे नाव तेथील मतदार यादीतून रद्द केले जाईल किंवा इतर ठिकाणच्या अथवा इतर तालुक्याचे मतदार यादीतील नाव बाद केले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
बोगस मतदारांचा आकडा कमी करणार
मागील वर्षी देखील तालुक्यातील मतदार यादीप्रमाणे स्थळ पाहणी करून तसेच इतर नागरिकांच्या तक्रारीवरून सर्व्हे करून अंदाजे एक हजार बोगस मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात बोगस मतदारांचा आकडा तालुक्यात मोठा असल्याने यावेळी अतिशय काटेकोरपणे सर्व्हे करून जास्तीत जास्त बोगस मतदारांचा आकडा कमी करण्याचा मानस निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.
बोगस मतदान निकाली निघणार...
बर्याच वेळा नगरपंचायत, ग्रामपंचायत, किंवा इतर मतदानाचे वेळी बाहेरील आयात बोगस मतदारांकडून मर्जीतील उमद्वारांना मतदान करायला लावून काही विशिष्ट नेते मंडळींना त्याचा चांगलाच फायदा होत असल्याचे निदर्शनास येत असते. त्यामुळे भविष्यात लोकशाही धोक्यात येऊ नये म्हणून निवडणूक विभागाने प्रामाणिक व काटेकोरपणे सर्व्हे करून बोगस मतदान निकाली काढण्याचे पवित्र काम करणे गरजेचे मानले जाते.