शहापूर : राजेश जागरे
एमएसआरडीसी अंतर्गत २०१८ पासून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड- पाटगाव - खोपोली महामार्गाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, अपूर्ण काम, धुळीचे साम्राज्य, चिखल आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून आता या प्रश्नावर महिलांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळागौरीच्या पवित्र सणादिवशी महिलांच्या वतीने खड्डेमय महामार्गावर बसून शांततापूर्ण जनआंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला असून, याबाबत शहापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील असंख्य नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी, व्यापारी तसेच रुग्ण दररोज या मार्गावरून प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. काहींचे हात-पाय निकामी झाले असून अपघातग्रस्त कुटुंबांवर उपचारांचा मोठा आर्थिक भार पडला आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहने वारंवार खराब होत असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. घरातून बाहेर पडलेला आपला माणूस सुखरूप घरी परत येईल की नाही, अशी चिंता प्रत्येक कुटुंबाला सतावत आहे, अशी संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली आहे.
तथापि नडगाव येथील स्मशानभूमी, दोनघर येथील विहीर तसेच नाल्यावरील विधीघाट रस्त्याच्या कामामुळे बाधित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी या रस्त्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलने, निवेदने आणि मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र आश्वासनांच्या पलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याने आता महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि नडगाव येथील स्मशानभूमी, दोनघर येथील विहीर तसेच नाल्यावरील विधीघाट रस्त्याच्या कामामुळे बाधित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी या रस्त्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलने, निवेदने आणि मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र आश्वासनांच्या पलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याने आता महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
महामार्गाची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आराखडा जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना मोबदल्याबाबत विश्वासात घ्यावे, आतापर्यंत झालेल्या अपघातांची] जीवितहानीची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नडगाव येथील स्मशानभूमी, दोनघर येथील विहीर व नाल्यावरील विधीघाट पूर्ववत करावेत. सार्वजनिक सुविधांच्या नुकसानीची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
रस्ता पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना कराव्यात तसेच सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था, दिशादर्शक फलक लावावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी ग्रा.पं.सदस्या चंद्रकला दुर्गे, सरपंच कमल रेरा, विद्या दुर्गे, जुही पवार, शोभा मांजे, दया भालके, सुनीता भालके, ताराबाई दुर्गे, ताराबाई भालके, कांताबाई हरड, सुनीता पवार, सीताबाई भालके, छब्बी सातपुते, सारिका फर्डे, विजया बेलवले, जुही पवार, शकुंतला भालके, जयवंती भालके, ताई मडके, रेखा पवार, भावना पवार उपस्थित होत्या.
हा प्रश्न केवळ रस्त्याचा नसून नागरिकांच्या जीविताचा, आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक पैशाच्या योग्य वापराचा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मंगळागौरीच्या दिवशी महिलांच्या वतीने खड्डेमय महामार्गावर आंदोलन करणार.चंद्रकला दुर्गे सदस्या ग्रा. पं. नडगाव