ठाणे : पुढारी वृत्तसेवा
हवामान विभागाने गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याला अनुसरून, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. मुंबई, उपनगरासह ठाणे जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. बुधवारी झालेल्या पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे नोकरदार वर्गासह, शालेय विद्यार्थी आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ तसेच आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या, महापालिकेच्या व खासगी शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बुधवारी रात्री उशिरा परिपत्रक जाहीर करून याबाबत कळविले आहे.