भिवंडी : ‘एनआयए’, ‘एटीएस’, ‘ईडी’ यांनी केलेल्या संयुक्त छापेमारीवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Pudhari File Photo
ठाणे

Bhiwandi raids | भिवंडीत दहशतवादी कारवायांसाठी कार्यरत केंद्रांवर छापे

‘एनआयए’, ‘एटीएस’, ‘ईडी’ची धडक कारवाई; पडघा-बोरिवलीत 60 ठिकाणी नवे नेटवर्क तयार केल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा- बोरिवली भागात दहशतवादी कारवायांसाठी गुप्त केंद्र तयार केल्याच्या माहितीवरून ‘एनआयए’, ‘एटीएस’, ‘ईडी’ या राष्ट्रीय तपास यंत्रणांनी 60 ठिकाणी संयुक्त छापे मारत दहशतवादी गुप्त केंद्रांचा शोध घेतला. अल-शाम नावाने प्रांत घोषित करून या कारवाया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. साकीब नाचण याचा मुलगा आणि 17 संशयितांना या भागातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या जबाबातून ही कारवाई झाली आहे.

संशयितांच्या घरांतील कागदपत्रे, इलेक्ट्रिकल साधने आणि आर्थिक व्यवहार याची तपासणी करण्यात आली आहे. ‘ईडी’ने संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. गुन्हेगारी आणि दहशतवादाचे केंद्र बनत असलेल्या या भागात साकीब नाचण याने स्वतंत्र इस्लामी प्रांत घोषित करून स्वतंत्र मंत्रिमंडळ आणि राज्यघटना तयार केली होती. नाचणच्या मृत्यूनंतर या कारवाया थांबल्या होत्या; पण पुन्हा दहशतवादी कारवायांनी डोके वर काढल्याने कारवाई केली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघाजवळील बोरिवली गावात रात्रीपासून ‘ईडी’, आयकर विभाग आणि ‘एटीएस’ यांनी संयुक्त छापेमारी सुरू केली आहे. दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या अनुषंगाने गावातील अनेक निवासी घरांवर ही कारवाई होत आहे. ही कारवाई सुरू असताना गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पडघा, पुणे, मालेगाव यासह महाराष्ट्रातील सुमारे 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन मोहीम राबवली जात आहे. टेरर मॉड्यूलशी संबंधित संशयित आर्थिक हालचालींच्या तपासात ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. ‘एनआयए’ने दाखल केलेल्या प्रकरणाच्या आधारे ‘ईडी’ने अलीकडेच गुन्हा नोंदवला असून, हा तपास साकीब नाचण प्रकरणाशी जोडला गेला आहे. 28 जून रोजी कारागृहात मृत्यू झालेल्या साकीब नाचणच्या दफनविधीनंतर ‘एटीएस’ची ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. साकीब नाचण हा कारागृहात असतानाच 28 जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता. भिवंडीतील पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली येथे बुधवारी रात्रीपासूनच छापे टाकण्यात आले आहेत, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

...अशी झाली कारवाई

बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या छापेमारीत राष्ट्रीय तपास यंत्रणा, ‘एटीएस’ आणि ‘ईडी’च्या पथकांनी बोरिवली गावातील अनेक घरांमध्ये झडती घेतली आहे.

संशयितांच्या घरातील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.

‘ईडी’च्या पथकांनी संशयास्पद पैशांच्या व्यवहारांची चौकशी केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेला साहाय्य करत असून, सुरक्षा आणि नियंत्रण सुनिश्चित केले जात आहे.

बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली ही कारवाई आजही सुरू आहे.

छापेमारीमागील कारणे

‘एटीएस’ आणि ‘ईडी’ने ही कारवाई दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत पुरवणार्‍या व्यक्तींच्या घरांवर लक्ष केंद्रित करून केली आहे.

आर्थिक व्यवहारांचे तपास : संशयितांनी कोणत्या माध्यमातून निधी गोळा केला, तो कुठे पाठवला, याचा तपास सुरू आहे.

पूर्वीच्या कारवाईंचा आधार : 2 वर्षांपूर्वी साकीब नाचण आणि त्याच्या मुलासह 17 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.

स्थानिक सुरक्षा संवेदनशीलता : बोरिवली गावात पुन्हा संभाव्य गुप्त नेटवर्क निर्माण होत असल्याची शंका.

अधिकार्‍यांच्या मते, ही कारवाई सुरक्षा आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक होती.

भिवंडी आणि पडघा गावाची पार्श्वभूमी

भिवंडी तालुका हे मुंबई महानगरपालिकेच्या जवळ असून, अनेक वर्षांपासून औद्योगिक आणि सामाजिकद़ृष्ट्या महत्त्वाचे आहे. पडघा आणि बोरिवली गाव हे गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या घटनांसाठी प्रसिद्ध झाले आहे.

साकीब नाचण याच्या मृत्यूपूर्वी या गावात अनेक गुप्त बैठकांचे आयोजन झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर गाव सामाजिक शांततेकडे वळले होते; पण आता या छापेमारीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT