डोंबिवली (ठाणे) : आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (दि.18) डोंबिवलीहून पंढरपूरला पहाटे सायकलने वारी निघाली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला...विठ्ठलाचा गजर करत निघालेल्या या दिंडीमध्ये अबाल-वृद्धांसह महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील गणपती मंदीरापासून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.
या दिंडीमध्ये ५० महिलांसह पुरूष आणि मुलांनी सहभाग घेतला आहे. ही वारी २२ जूनपर्यंत पंढरपूरात वास्तव्य करणार आहे. तेथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन येणार्या वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन आणि देवदर्शन असे या सायकलदिंडीचे उद्देश आहेत. बहुसंख्य महिलांचा सहभाग असलेल्या या सायकलवारीत १५ वर्षांच्या मुलांपासून ७८ वर्षांच्या महिला व पुरूषांचा समावेश आहे.
डोंबिवली (ठाणे) हे सर्व सायकलस्वार २२ जूनला रात्री डोंबिवलीत परतणार आहेत. हे सर्वजण वारीच्या वाटेवर, तसेच पंढरपूरात वास्तव्याला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आणि त्यांना मदत करणार आहेत. सायकलस्वारांसोबत बस, टेम्पो आणि रूग्णवाहिका राहणार आहे.
पाण्याच्या बॉटल, औषधे, खाण्याचे पदार्थ, आदी वस्तूंचा उपयोग वारकऱ्यांसाठी केला जाणारा आहे. या वारीसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदत देखिल दिली आहे. बुधवारी (दि.18) पहाटे वारीला निघण्यापूर्वी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मदत देऊन शुभेच्छा दिल्या.