आसनगाव : एरव्ही कोकणात धो धो कोसळणार्या पावसाने गेल्या आठ दिवसापासून अचानक दडी मारल्याने भातपिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. शहापूर तालुक्यातील काही भागात सध्या लागवड केलेल्या भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने भात पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कष्टाने लावलेले भात पीक हातातून जाणार की काय, या विवंचनेत शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे.
सध्यस्थितीत शहापूर तालुक्यासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भातशेती लागवड झालेली असून भाताच्या रोपांनी देखील चांगला जोर धरला होता. मात्र अचानक पावसाने दडी मारल्याने या लहरी हवामानाचा फटका भातपिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील काही भागांत भात पिक सफेद पडल्याचे निदर्शनात आले आहे.
शेतकरी बांधवांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विविध कीटकनाशके फवारणी करून बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कीटकनाशके फवारणीचे योग्य मार्गदर्शन नसल्याने फवारणी शेतकर्यांना किती फायद्याची ठरेल. मजुरी, बियाणे, भांडवल खर्च कसा निघणार? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
शेतकर्यांनी सुरळीतील अळी (बगळ्या) या किडीच्या नियंत्रणासाठी व विविध उपाययोजनांच्या माहितीकामी गावाचे कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.कुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी