ठाणे : मानलेल्या बहिणीसोबत छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन 51 वर्षीय व्यक्तीने तिघांवर पिस्तूलातून फायरिंग केली. या घटनेत दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका तरुणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी जयन शिवानंदन नायर यास पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या मुंब्रा शहरात गुरुवारी (दि.२) सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. कैलास नगर, मुंब्रा येथील बिस्मिल्ला चाळ रूम नंबर 2 येथे राहणारा आरोपी जयन शिवानंदन नायर याने त्याच्या मांनलेल्या बहिणीची छेडछाड का करता, असा जाब विचारण्यास गेला. या कारणावरून संबंधित तरुण आणि जयनमध्ये वाद झाला. या वादातून जयन नायर याने तिघा तरुणांवर त्याच्या जवळील पिस्तूलातून फायरिंग करून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेत अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख समीर अहमद आणि समीर अहमद शेख हे तिघे तरुण गंभीर जखमी झाले. जखमी यांना मुंब्रातील एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमी तरुणांपैकी अकबर अब्दुल शेख या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, अवैध हत्यार कायदा व इतर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीस फायरिंग करण्यात आलेल्या पिस्तूलासह अटक करण्यात आली आहे ; अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.