Mumbra Local Train Accident Update
ठाणे : सोहम शिर्के
रेल्वे प्रशासनाने प्रशासनाने मुंब्रा-दिवा दरम्यान अपघातात मृत झालेल्या तरूणांच्या कुटुंबांना केवळ 20 रूपयांच्या तिकिटांचा पुरावा नसल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून नुकसान भरपाई नाकारली जात आहे. चार महिन्यांपूर्वी मुंब्रा-दिव्याच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला 20 रुपये तिकिटांचा पुरावा हवा आहे. केवळ तिकिटाचा पुरावा नसल्याने मृत तरूणांचे कुटुंबीय रेल्वे प्रशासनाकडे नुकसान भरपाईसाठी हेलपाटे मारत आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने हजारो चाकरमानी लोकलने प्रवास करतात. लोकलची अपुरी संख्या आणि प्रवाशांचा वाढता भार या व्यस्त प्रमाणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागतो. प्रवाशांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेवून प्रवास करावा, या नावाखाली रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातात तब्ब्ल 13 प्रवाशी लोकल रेल्वेमधून ट्रॅकवर पडले त्यांपैकी 9 प्रवाशी गंभीर जखमी झाले तसेच 4 प्रवाश्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर मध्य उपनगरीय रेल्वे प्रशासनाने दुर्दैवी रेल्वे अपघातात मृत झालेल्या प्रवाश्यांना श्रद्धांजली वाहत मृत आणि जखमी प्रवाश्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन केले होते. जखमी प्रवाशांना नुकसान भरपाई 1 लाख आणि आरोग्य खर्च तसेच मृत प्रवाश्यांना 5 लाखापर्यंत मदत जाहीर केली होती. परंतु अद्याप कोणतीही मदत जखमी प्रवाश्यांना आणि मृत प्रवाश्यांच्या कुटुंबाला मिळालेली नाही आहे.
ह्या रेल्वे दुर्घटनेत तब्ब्ल 13 प्रवासी रेल्वेतून ट्रॅकवर पडले शिवा गवळी (23), आदेश भोईर (26), रेहान शेख (26), अनिल मोरे(40), तुषार भगत (22), मनीष सरोज (26), मछिंद्र गोत्रने (39), स्नेहा धोंडे(21), प्रियांका भाटिया(26) ह्या प्रवाश्यांना दुर्घटनेदरम्यान गंभीर दुखापत झाली तसेच मयूर शाह (50), केतन दिलीप सरोज (23), राहुल गुप्ता (27), विकि मुख्यदल (34) या प्रवाश्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
दिवा साबे गाव परिसरातील राहुल गुप्ता 27 वर्षीय घरातला कमावता तरुण दिव्याहून कुर्ल्याला लोकलने प्रवास करत असता रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडला तसेच. घरात वयोवृद्ध आई-वडील असून घरातील इतर जबाबदारी तरुणाच्या पगारातून पार पडली जायची. परंतु अपघातानंतर तरुणाच्या कुटुंबावर अक्षरशः आर्थिक संकटाचं सावट आलं आहे.
तरुणाचे कुटुंबियांनी रेल्वे प्रशासनाच्या मदतीसाठी रेल्वे ॲक्सीडेंट क्लेम रिपोर्ट रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयात तीन महिन्याअगोदर दाखल केला आहे. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून कुटुंबियांना तांत्रिक कारणे देत नुकसान भरपाईपासून जुगवण्यात आले. व प्रवासाची तिकीट दाखवून प्रवास केल्याचे पुरावे द्या! असे म्हणण्यात आले. खरंच जीवाचे मोल नसून पैसे आहेत हेच खरं रेल्वे प्रशासनाने ह्या व्याख्येला खरे केले आहे.
उपचारांचा खर्च पीडितांनी स्वतःच केला
केतन सरोज याच्या कुटुंबियांने देखील मागणी केली होती व त्यांच्या नुकसान भरपाई रक्कम रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणं सांगून दुर्लक्ष केले. एखादा घरातला कमावता तरुणाचे मोल 20 रुपयाच्या तिकीटापेक्षा कमी आहे, हे रेल्वे प्रशासनाने तरुणाच्या कुटुंबियांना सिद्ध करून दिले. त्याचप्रमाणे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाश्यांना वैद्यकीय आणि आर्थिक मदत करण्यात येईल, असे जाहीर केले. परंतु जखमी प्रवाशांना कोणतीही मदत रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेली नाही .
जखमी प्रवाश्यांने आपल्या उपचाराचा खर्च स्वतःच केल्याचे म्हटले आहे. यासंबंधी रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे देखील नुकसान भरपाई संदर्भात मागणी करण्यात आली, परंतु कोणतेही निष्कर्ष झाले नाही. तसेच रेल्वे प्रशासन हृदयहीन आहे त्यांना नागरिकांच्या जीवाचे मोल नाही, अशी टीका करण्यात आली.