ठाणे: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या बैठकीत रिक्षा भाडे १ रुपयांनी तर टॅक्सी भाडे दोन रुपयांनी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ही भाडेवाढ १ सप्टेंबरपासून लागू होणार असून आता ऑटो रिक्षाला पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये आणि टॅक्सीच्या पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये मोजावे लागणार आहेत.
रात्री बारा वाजल्यानंतर ३४ रुपये आणि ४१ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. या भाडेवाढ लागू करण्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षा रिक्षा -टॅक्सी चालकांना लागली आहे.
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी चार रुपयांची भाडेवाढ मागितली होती. मात्र परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्षा एक रुपये आणि टॅक्सी भाडेवाढ दोन रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये होणार आहे. त्यानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी आकारण्यात येणारे किमान भाडे ३३ रुपये निश्चित करण्यात आले आहे. टॅक्सीला रात्री बारा वाजल्यानंतर ४१ रूपये मोजावे लागतील तर रिक्षाला ३४ रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी प्रवाशांना मोजावे लागणार आहेत.
रिक्षाला पहिल्या दीड किलोमीटरसाठी २७ रुपये झाले असून पुढील प्रति किलोमीटर दर १८.२२ रुपये असणार आहे. प्रतीक्षा शुल्क ८.७५ रुपये रिक्षा तर १० रुपये ३३ पैसे टॅक्सीला द्यावे लागतील.
ही भाडेवाढ मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोबिवली, वसई-विरार, पनवेल आणि पालघर या संपूर्ण एमएमआर परिसरात लागू असणार आहे. सीएनजीच्या दरात झालेली वाढ, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, विमा आणि परवाना नूतनीकरणाचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन खटुआ समितीच्या शिफारसीनुसार आणि सूत्रानुसार ही दरवाढ करण्यात आल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.