ठाणे: मुंबई - गोवा मार्ग या गणेशोत्सवात पूर्ण करणारच या घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्र्यांपासून तर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत केली असली तरी या गणेशोत्सवातही मुंबई-गोवा मार्गावर २० ठिकाणे धोकादायक स्थितीत आहेत. यामध्ये पळस्पे ते महाड, खेड ते हातखंबा आणि सिंधुदुर्गात जानवली या भागाचा समावेश आहे.
गणपती उत्सवासाठी ‘येवा कोकण आपलाच असा’ असे सांगून सुखदायी प्रवासाचे स्वप्न राजकीय लोक दाखवत असतील, तरी प्रत्यक्षात नेहमीच्या पावसाळ्याप्रमाणे महामार्गाचे दुखणे कायम आहे. गेली १८ वर्षे महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. हा महामार्ग पूर्ण करण्यात सरकारही हतबल आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील २० ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
धोकादायक २० ठिकाणे ब्लॅक स्पॉट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा मोठा धोका असलेली तब्बल २० ठिकाणे (ब्लॅक स्पॉटस्) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ब्लॅक स्पॉटस् आहेत.
गेल्या १८ वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असतानाही, अपघातांचे सत्र रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून महामार्ग पोलिस आणि राज्य पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते पोलादपूर या १५० किलोमीटरच्या टप्प्यात सर्वाधिक १७ अपघातप्रवण ठिकाणे आढळली आहेत.