डोंबिवली: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पश्चिम डोंबिवलीतील मुख्य सुभाष रोडची अवस्था मृत्यूच्या सापळ्यासारखी झाली आहे. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभारामुळे काँक्रीटीकरणासाठी खोदलेला रस्ता अर्धवट अवस्थेत पडून आहे.
सद्याचे खड्डे, धुळीचे लोट आणि उद्या पावसानंतर होणाऱ्या चिखलाच्या साम्राज्याने नागरिकांचे जगणे मुश्कील होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा विद्यमान प्रल्हाद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थित राजसैनिकांनी शनिवारी रस्त्यात ठाण मांडून आंदोलन केले.
सुभाष रोडचे काम गेल्या 8 महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. संपूर्ण रस्ता उकरून टाकला आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. पण काम पूर्ण करण्याची कुणालाच घाई नाही. आता पाऊस तोंडावर आला आहे. हे खड्डे पाण्याने भरले की येथे अपघातांची मालिका सुरू होईल.
वाहने, रूग्णवाहिका, शाळेच्या बसेस, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागेल. पावसाळ्यात सुभाष रोड म्हणजे यमाचा दरवाजा ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांकडून देण्यात येत आहे.
हाच धागा पकडून मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमसी आणि एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. रस्ता खोदल्यापासून येथे धुळीचे साम्राज्य आहे. दुकानांचे शटर उघडताच धूळ आत घुसते.
ग्राहक यायला तयार नाहीत. अनेक व्यापाऱ्यांचा धंदा 70 टक्के घटला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अस्थमाच्या रूग्णांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. धूळीमुळे आजारी पडलोय, पण प्रशासनाला जाग येत नाही, असा आक्रोश रहिवाशांसह दुकानदारांकडून केला जात आहे.
मनसे रस्त्यावर...अन् नगरसेवक प्रल्हाद म्हात्रेंचा एल्गार
या संतापाचा उद्रेक शनिवारी रस्त्यावर दिसून आला. मनसेचे ज्येष्ठ नेते तथा या भागाचे विद्यमान नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी थेट सुभाष रोडवरच ठिय्या मांडला. केडीएमसी-एमएमआरडीएचे अधिकारी जनतेला वेठीस धरत आहेत. पावसाळ्यात येथे कुणी गंभीर जखमी झाला...वा मृत्यू पावला तर त्याला जबाबदार कोण ? काम सुरू केलेच तर पूर्ण कधी करणार ? असा घणाघात नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी केला. काम पूर्ण करा, नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा रस्त्यावर उतरलेल्या उपशहराध्यक्ष राजू पाटील, यांच्यासह आदींकडून प्रशासनाला दिला.