भाईंदर : राजू काळे
एमएमआरडीएकडून उत्तनच्या डोंगरी येथील सर्वे क्रमांक 19 वरील 59 हेक्टर 79 एकर शासकीय जागेत मेट्रो कारशेड नियोजित करण्यात आली. या कारशेडच्या जागेत भविष्यात मोबदला मिळेल या लालसेपायी या जागेत अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या. पालिकेने त्यावर तोडक कारवाई केल्यानंतर पुन्हा त्यावर झोपड्यांचे अतिक्रमण फोफावू लागले असून त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमएमआरडीएने अंधेरी ते दहिसर दरम्यानची मेट्रो भाईंदरपर्यंत विस्तारीत केल्यानंतर अंधेरी ते दहिसर व दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीए- कडून कारशेड उत्तन येथील सर्वे क्रमांक 19 वरील 59 हेक्टर 79 एकर शासकीय जागेत प्रस्तावित करण्यात आली.
कारशेडसाठी निश्चित करण्यात आलेली जागा महसूल विभागाने एमएमआरडीएच्या ताब्यात दिल्यानंतर एमएमआरडीएकडून कारशेडची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. कारशेड बांधकामासाठी ठेकेदाराची नियुक्तीसुद्धा करण्यात आली. कारशेडसाठी भूसंपादन होण्यापूर्वीच येथील भुमाफिया व झोपडपट्टी माफियांकडून घेण्यास सुरुवात झाली. त्यांनी कारशेडच्या भूसंपादनावेळी मोबदला मिळण्याच्या लालसेपायी नियोजित कारशेडच्या जागेत झोपड्यांचे अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. याची माहिती ना पालिकेला, ना महसूल विभाग व ना एमएमआरडीएला होती.
विशेष म्हणजे या झोपड्यांना सुद्धा क्रमांक देण्यात आले असून आणखी झोपड्या बांधण्यासाठी आवश्यक सामग्री त्याठिकाणी नेण्याकरीता रस्त्याचे देखील बांधकाम करण्यात आल्याचे दिसून आले आहे. असे असतानाही त्याची माहिती कोणत्याही शासकीय व प्रशासकीय यंत्रणांना नसावी, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे हा एक संशोधनाचाच विषय ठरला असल्याचे दिसून येत आहे.
या झोपड्यांना सर्वे करताना पावतीसह वीज जोडणी देखील देण्यात आली. सर्वे पावतीसाठी एका झोपडीमागे सुमारे 2 लाख रुपये तर वीज जोडणीसाठी सुमारे 1 लाख रुपये वसूल करण्यात आले, तर झोपड्या सुमारे 8 ते 10 लाखांना विकून येथील दलाल पसार होण्याच्या तयारीत असतानाच दैनिक पुढारीने त्याचे वृत्त 28 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करून पालिकेला त्या झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यास भाग पाडले. पालिकेने येथील झोपड्यांचे अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले.
मात्र येथील खासगी जागेवरील झोपड्यांचे मात्र अतिक्रमण जैसे थे राहिल्याचे दिसून येते. या झोपड्यांचे अतिक्रमण पाहता ते काहींच्या पाठबळामुळे करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. दरम्यान नियोजित कारशेडसाठी या जागेतील सुमारे 10 हजारांहून अधिक झाडे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अतिक्रमणांचे पुन्हा वारे...
स्थानिक रहिवाशी व पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केल्यानंतर येथील नियोजित कारशेड इतरत्र स्थलांतर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केले. यामुळे स्थानिक रहिवासी व पर्यावरण प्रेमींना दिलासा मिळाला असला तरी कारशेड स्थलांतराची अधिसूचना शासनाकडून अद्यापही जारी करण्यात आलेली नाही. याच संभ्रमात असलेल्या झोपडीमाफियांमध्ये अतिक्रमणांचे वारे पुन्हा वाहू लागल्याचे त्यांनी पुन्हा याच जागेत झोपड्यांचे अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्यावरून दिसून आले आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.