राजू काळे
भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेची पहिली सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) शाळा सुरु करण्यास होत असलेल्या विलंबाच्या अनुषंगाने हि शाळा केव्हा सुरु होणार, याकडे गरीब व गरजू कुटुंबातील मुलांचे लक्ष लागले असतानाच तीला कायमस्वरूपी ब्रेक तर नाही लागणार, अशी चिंता त्या मुलांना लागून राहिली आहे.
यानुसार हि शाळा सुरु होण्याचे नाव घेत नसल्याचेच दिसून आले आहे. दरवर्षी हि शाळा सुरु करण्याचा प्रशासनाकडून होत असलेला दावा यंदाही फेल झाल्याचे पहायला मिळाले.
पालिकेने भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरात बांधकाम टिडीआरच्या माध्यमातून चार मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत पालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरु करण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेण्यात आला.
त्यानुसार हि शाळा २०२५ मधील शैक्षणिक वर्षांपासून कोणत्याही परिस्थितीत सुरु करून ती खाजगी संस्थेऐवजी पालिकेकडूनच चालविण्यात यावी, अशी ठाम भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.
तर हि शाळा चालविणे अत्यंत खर्चिक बाब असल्याने ती पालिकेऐवजी खाजगी संस्थेमार्फतच चालविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. शिक्षण विभागाने तत्कालीन आयुक्तांच्या निर्देशानुसार डिसेंबर २०२३ मध्ये एक्सप्रेशन ऑफ इन्टरेस्टचे (संबंधित कामात स्वारस्य असणे) प्रस्ताव खाजगी शैक्षणिक संस्थांकडून ऑनलाईन मागविले होते.
त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतर पालिकेने तब्बल तीन वेळा प्रस्ताव मागविले. दरम्यान मुंबईतील दोन संस्थांसह नवी मुंबईतील एका संस्थेने आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे शाळा चालविण्याबाबतचे सादरीकरण केले.
मात्र पालिकेने ऑनलाईनद्वारे मागविण्यात आलेल्या प्रस्तावाला त्या संस्थेने प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्या संस्थेची नियुक्ती करण्यात पालिकेला तांत्रिक अडचण निर्माण झाली. पालिकेने तिसऱ्यांदा मागविलेल्या ऑनलाईन प्रस्तावाला एकाच खाजगी शैक्षणिक संस्थेने प्रतिसाद दिला.
एकाच खाजगी संस्थेने ऑनलाईन प्रस्ताव सादर केल्याने प्राप्त प्रस्ताव पालिकेकडून स्विकारण्यात येणार असल्याची शक्यता त्यावेळी वर्तविण्यात आली होती. त्यावर सरनाईक यांनी आक्षेप घेत हि शाळा खाजगी शैक्षणिक संस्थेला चालविण्यास दिली तर भविष्यात त्या संस्थेकडून शाळेतील शिक्षणाचे व्यापारीकरण किंवा बाजारीकरण होण्याची भिती व्यक्त केली.
यामुळे हि शाळा पालिकेकडूनच चालविण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी आयुक्तांपुढे मांडली. यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर शिक्षक व आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पालिकेच्या इतर माध्यमांच्या शाळा ज्या पद्धतीने चालविल्या जातात त्याच पद्धतीने सीबीएसई शाळा चालविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर प्रशासनाने शाळा सुरु करण्याची प्रक्रिया बासनात गुंडाळल्याने ती अद्याप सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
परिणामी शाळेची इमारत धूळ खात उभी असून ती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तरी सुरु होईल का, असा प्रश्न शहरातील गरीब व गरजू कुटुंबातील मुलांना व पालकांना पडला आहे. कारण या शाळेत याच कुटुंबातील मुलांना प्रवेश देऊन त्यांचे सीबीएसई शाळेत शिकण्याचे स्वप्न पालिकेकडून पूर्ण करण्यात येणार आहे. तसे प्रयोजन प्रशासनाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान दैनिक पुढारीने २३ जानेवारी २०२५ रोजी शाळा सुरु होत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सरनाईक यांनी आयुक्तांना कोणत्याही परिस्थितीत हि शाळा २०२५ मधील शैक्षणिक वर्षांपासून सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयुक्तांनी हि शाळा त्या वर्षी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात सुरुवातीला हि शाळा पालिकेकडून चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
तसेच शाळेतील शिक्षण पालिका शाळेतील शिक्षकांकडूनच दिले जाण्याचे नियोजन करण्यात आले. सुरुवातीला या शाळेत ज्युनिअर व सिनिअर केजीचे वर्ग सुरु करण्यास प्राधान्य दिले जाणार होते. आणि प्रवेशासाठी १ एप्रिल २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या गरीब व गरजू मुलांना पालिकेच्या इतर शाळांप्रमाणेच मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचे तत्कालीन आयुक्तांनी जाहीर केले होते.
मुहूर्त कधी
मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या सीबीएसई शाळांनंतर मिरा-भाईंदर महापालिका, सीबीएसई शाळा सुरु करणारी दुसरी महापालिका ठरणार होती. सुरुवातीला हि शाळा पालिकेकडून चालविण्यात येणार असली तरी भविष्यात एखाद्या संस्थेने हि शाळा चालविण्यात स्वारस्य दाखविल्यास पालिकेने निश्चित केलेल्या धोरणानुसार त्या संस्थेला शाळा चालविण्यासाठी दिली जाणार होती. मात्र त्याचे घोंगडे अद्याप भिजत ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.