भाईंदर: मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जुना पेट्रोल पंप ते आझाद नगर दरम्यानच्या मेट्रो मार्गाखाली बांधण्यात आलेल्या बॉटलनेक फेम उड्डाणपुलाचे अनौपचारिक उदघाटन भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी घाईघाईने करून नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
या लोकार्पणाची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
लोकार्पण केलेल्या या उडाणपुलाच्या बांधकामात अनेक गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी आ. नरेंद्र मेहता यांनी स्वतः महाराष्ट्र विधानसमेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केल्याची बाब सरनाईक यांनी निदर्शनास आणून दिली.
त्यावेळी राज्य सरकारने या प्रकरणाची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा केली होती. त्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची किंवा त्याचा अहवाल सार्वजनिक झाल्याची माहिती उपलब्ध नसताना तसेच ज्या पुलाबाबत चौकशीची मागणी करण्यात आली होती.
त्याच पुलाचे लोकार्पण स्वतः आ. नरेंद्र मेहता यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या पुलाच्या चौकशीचे काय झाले, दोष निश्चित झाले का, त्रुटी दूर करण्यात आल्या का, चौकशी अहवालाशिवाय लोकार्पण करण्यामागील कारणे काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
या पुलावरील असमतोल पृष्ठभागामुळे वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त होत असून या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊ लागली आहे. तथापि पुलावरील धोकादायक परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची तक्रार नागरिकांची आहे.