ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी मुंबईत दाखल होणाऱ्या 25 हजार पेट्या यावर्षी कमी झाल्या असून केवळ दहा हजार पेट्याच मुंबईत एपीएमसी मार्केटला दाखल झाल्या परिणामी हापूस पेटीचा दर तीन हजार ते पाच हजार असा कायम राहिला आहे.
हवामानातील बदल आणि अवेळी पाऊस यामुळे आंब्याचा हंगाम पुढे गेला आहे. एप्रिल महिन्यात पुरेसा आंबा येईल, असा विश्वास आंबा उत्पादक शेतकरी आणि एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गुढीपाडव्याच्या तोंडावर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये फळ बाजारात हापूसच्या 10 हजार 520 पेट्या दाखल झाल्या. यंदा गुढीपाडवा लवकर आल्यामुळे आंबा बाजारात आधीच मोठी हालचाल सुरू झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढत असल्याने व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.
कोकणातील हापूस सोबतच कर्नाटक आणि इतर राज्यांतूनही आंब्याची आवक वाढली आहे. दरम्यान हापूस आंब्याची आवक जरी वाढली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत हापूसचे दर अद्यापही काहीसे चढेच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.