नेवाळी : कल्याण डोंबिवली क्षेत्रात असलेल्या 27 गावांमधील गावठी हातभट्ट्यांवर कारवाईचा धडाका पुन्हा एकदा सुरू झाला आहे. कल्याण पूर्वेतील माणेरे गावात गावठी हातभट्टीची निर्मिती सुरू असताना उल्हासनगर गुन्ह शाखेने धाड टाकत लाखो लिटर नवसागरमिश्रित रसायन नष्ट केले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नितीन चंद्रकांत फुलोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर शहराला लागून असलेल्या माणेरे, चिंचपाडा परिसरातून गावठी दारूचा पुरवठा वाढला आहे. वाढत्या गावठी दारूच्या पुरवठ्याला लगाम घालण्यातही संबंधित यंत्रणेला अपयश येत असून सातत्याने शहरी भागामध्ये कमी पैशात अतिरिक्त नशा करण्यासाठी गावठी दारूची मागणी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हगारांना कमी किमतीत दारूचा पुरवठा करणार्या कारखानदारांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने लक्ष केले आहे. याच पार्श्वभूमीवर 27 गावांमधील गावठी हातभट्ट्यांवर ही कारवाई करण्यात आली असून नवसागर मिश्रित रसायन नष्ट करण्यात आले.