नेवाळी : श्री मलंगगड येथील धार्मिक वारशासोबतच ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वस्तूंच्या जतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पेशवेकालीन तोफा व तोफगोळे कोणाच्या ताब्यात आणि कोणत्या अधिकाराने ठेवण्यात आले होते, याची चौकशी करण्याची मागणी सकल हिंदू समाजाने राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाच्या प्रशासकीय चौकशीला वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तोफा शनिवारी पुन्हा श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात दिसून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे एवढी वर्ष तोफा होत्या कुठे असा प्रश्न श्री मलंग भक्तांना पडला आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत श्री मलंगगड संस्थेच्या मालमत्तेत असलेल्या पेशवेकालीन तोफा आणि काही तोफगोळे नासिर खान अफजल खान यांच्या ताब्यात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या ऐतिहासिक वस्तू कोणत्या अधिकाराने खासगी ताब्यात ठेवण्यात आल्या होत्या, त्याची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या चौकशीला प्रशासकीय स्तरावर वेगाला होता. त्यानंतर अखेर १५ ऑगस्ट पासून ऐतिहासिक तोफा श्री मलंग मत्येंद्रनाथांच्या समाधी मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ दिसू लागल्या आहेत.
किल्ले श्री मलंगगडाला धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक संदर्भही लाभले आहेत. त्यामुळे येथील प्राचीन वास्तू, पुरातन वस्तू आणि ऐतिहासिक अवशेषांचे जतन कोणत्याही राजकीय अथवा वैयक्तिक हस्तक्षेपापासून मुक्तपणे व्हावे, अशी भूमिका यापूर्वीही विविध स्तरांतून मांडण्यात आली आहे. अखेर देशाच्या स्वतंत्र दिनी पुरातन तोफा श्री मलंगमत्सेंद्रनाथांच्या मंदिराच्या प्रांगणात दाखल झाल्याने श्री मलंग भक्तांकडून त्याचे स्वागत करण्यात आले आहे.
तक्रारीनंतर प्रशासकीय पातळीवर चौकशीला वेग आल्यानंतर संबंधित तोफा श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिरासमोरील प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, १५ ऑगस्ट रोजी या तोफा पुन्हा मंदिराच्या प्रांगणात दिसून आल्याने त्या नेमक्या कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या प्रक्रियेतून पुन्हा हलविण्यात आल्या, असा सवाल उपस्थित होत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या वस्तूंची मालकी, ताबा, जतनाची जबाबदारी तसेच त्यांचे स्थलांतर याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पेशवेकालीन तोफा व तोफगोळ्यांचा इतिहास आणि सद्यस्थिती जनतेसमोर आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“ डिसेंबर २०२५ पासून आम्ही या ऐतिहासिक तोफांसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्वातंत्र्यदिनी तोफा पुन्हा मंदिर प्रांगणात दिसणे ही समाधानाची बाब असून, त्यांच्या कायमस्वरूपी जतनासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील. पत्रव्यवहारातील एक विषय मार्गी लागला आहे अन्य विषय मार्गी लागतील ही अपेक्षा आम्हाला आहे. ”पराग तेली , हिंदू समाज कार्यकर्ता