नेवाळी : किल्ले श्री मलंगगडाच्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्यासाठी आता तेथील पुरातन तोफा, तोफगोळ्यांना पारंपरिक तोफगाडे बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या ऐतिहासिक तोफांचे ऊन, पाऊस, वारा तसेच अन्य नैसर्गिक कारणांपासून संरक्षण करून त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह,उप मुख्यमंत्री, ठाणे जिल्हाधिकारी यांच्यासह, वन विभाग, लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आल आहे.
मलंगगड हा ठाणे जिल्ह्यातील धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला परिसर आहे. किल्ल्याच्या परिसरात आढळलेल्या पुरातन तोफा आणि तोफगोळे या त्या काळातील इतिहासाच्या महत्त्वपूर्ण खुणा मानल्या जात आहेत. मात्र, या तोफांना योग्य प्रकारचे तोफगाडे नसल्याने त्यांचे दीर्घकालीन संरक्षण कसे करायचे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित तोफांना त्यांच्या ऐतिहासिक स्वरूपाशी सुसंगत पारंपरिक तोफगाडे बसविण्यात यावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. तोफगाडे बसविण्यापूर्वी पुरातत्त्व तज्ज्ञ, वन विभाग आणि संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांकडून पाहणी व मार्गदर्शन घेण्यात यावे. तसेच आवश्यक डागडुजी, संरक्षक उपाययोजना आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या कामामुळे ऐतिहासिक तोफांचे मूळ स्वरूप अथवा ऐतिहासिक महत्त्व बाधित होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित शासकीय विभागांकडून आवश्यक परवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मलंगगडचा इतिहास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष वास्तू आणि पुरातन वस्तूंच्या माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी या ऐतिहासिक तोफांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.