प्रा. सुहास बारटक्के
ठाणे-रायगडमधील फणसाड अभयारण्य, ठाण्यातलं तानसा अभयारण्य, रायगडमधलं कर्नाळा पक्षी अभयारण्य, रत्नागिरी जिह्यात येणारा कोयना अभयारण्याचा भूभाग, कोल्हापूर रत्नागिरी सीमा भागातलं राधानगरी अभयारण्य, व्याघ्रप्रकल्प, सिंधुदुर्ग गोवा सीमेवरचं थेट कर्नाटकाला जोडलेलं तिलारी अभयारण्य, रत्नागिरीपर्यंत आलेलं चांदोली अभयारण्य अशी अभयारण्ये या क्षेत्रात येतात. तर कोकणला लाभलेल्या 720 कि.मी. लांबीच्या सागरी किनाऱ्यावरचं ‘मालवण मरिन लाईफ’ अभयारण्य हे सागरी अभयारण्य अनेक समुद्री जीवांचे आश्रयस्थान आहे.
पश्चिमेला निळाशार अरबी समुद्र...
पूर्वेकडे सह्याद्रीचे उंचच उंच कडे...
आणि त्यामध्ये वसलंय ते हिरवंगार निसर्गरम्य कोकण!
ठाणे जिल्ह्यापासून थेट गोवा राज्यापर्यंत पसरलेल्या या लांबच लांब चिंचोळ्या कोकणपट्टीत महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हे जिल्हे येतात. सह्याद्रीचा माथा ते थेट समुद्रकिनारा अशी ही चिंचोळी पट्टी असली तरी सह्याद्रीचा पठारी भाग ते सह्याद्रीचा पायथा असा जंगलानं व्यापलेला भाग हा पुणे, सातारा, कोल्हापूर जिह्यातूनही पसरलेला आहे. त्यामुळे इथली जंगलं ही केवळ कोकणापुरतीच मर्यादित नसून घाटमाथा व पठारी भाग असा हा संयुक्त परिसर आहे. त्यामुळेच कोकणातील अभयारण्ये ही पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक यांच्याशी जोडलेली आहेत. अनेक प्राण्यांचा म्हणूनच हा एक मोठा ‘कॉरिडॉर’ आहे.
कोकणातल्या जंगलात केरळ कर्नाटकातून येणारे हत्ती वा इतरही अनेक प्राणी त्यामुळेच आढळून येतात. सह्याद्रीच्या कुशीत वनसंपदा भरपूर, सदाहरित जंगले खूप म्हणूनच पट्टेरी वाघ, बिबळे, हत्ती, गवे, अस्वले, रानकुत्रे, शेकरू, ससे, हरणे, भेकरे, साळींदर, रानमांजरे, मुंग्याखाऊ यांचे हे आश्रयस्थान आहे. विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी साप, सरडे, पाली, विंचू, जवळपास दोनशे प्रकारचे पक्षी, फुलपाखरे इथल्या जंगलात आढळून येतात, तर कळंब, बिबळा, खैर, साग, बांबू (गवत) ऐन, किंजळ, आसानी, सप्तपर्णी, पळस, पांगारा, शेवर, अंजन, कांचन, करवंद, कारवी अशा वृक्षवल्ली या ठिकाणी आढळतात.
सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्या या थेट पश्चिमेला समुद्राकडे धावतात व त्यांच्या खाड्यांमध्ये खारफुटीची जंगलं बहरली आहेत. या खारफुटीच्या जंगलात ऑटर्स, कासवं, मगरी, पाणसाप, खार, टाणटुणे मासे, असे उभयचर राहतात, तर समुद्र पक्षी, समुद्रगरुड, ब्राह्मणी घार, खंड्या (किंगफिशर) ककणेर, असंख्य प्रकारचे पक्षी, किटक इथे रहातात. परिसराप्रमाणं सरडे आणि खेकडे इथं पहायला मिळतात, तर कारवीची निळाई इथंच अनुभवायला मिळते. यामुळेच जैवविविधतेने नटलेला प्रांत म्हणून कोकण अख्ख्या जगात ओळखलं जातं. सागरी भूभाग, जंगली भूभाग, खाडीपट्टा, असं एक अनोखं मिश्रण म्हणजे कोकणप्रांत !
ठाणे-रायगडमधील फणसाड अभयारण्य, ठाण्यातलं तानसा अभयारण्य, रायगडमधलं कर्नाळा पक्षी अभयारण्य, रत्नागिरी जिह्यात येणारा कोयना अभयारण्याचा भूभाग, कोल्हापूर रत्नागिरी सीमा भागातलं राधानगरी अभयारण्य, व्याघ्रप्रकल्प, सिंधुदुर्ग गोवा सीमेवरचं थेट कर्नाटकाला जोडलेलं तिलारी अभयारण्य, रत्नागिरीपर्यंत आलेलं चांदोली अभयारण्य अशी अभयारण्ये या क्षेत्रात येतात.
तर कोकणला लाभलेल्या 720 कि.मी. लांबीच्या सागरी किनाऱ्यावरचं ‘मालवण मरीनलाईफ’ अभयारण्य हे सागरी अभयारण्य अनेक समुद्री जीवांचे आश्रयस्थान आहे. मालवणचं हे सागरी उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे. (भारतातील तिसरे). मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरचं हे सागरी उद्यान कोरलं (खडकांच्या रांगा) आणि समुद्रजीवांची रेलचेल असलेलं एक समुद्राखालचं सुंदर अभयारण्य आहे. 29.12 स्के. किलोमीटर एवढ्या लांबी-रुंदीचं हे सागरी वन सागरी जैवविविधतेचं आगरच आहे.
इथं समुद्री खडकात राहणारे विविध प्रकारचे प्राणी मासे, प्रवाळ वनस्पती, जिवंत वनस्पती, खेकडे, कालवे आढळून येतात. 1987 साली याची सुरुवात झाली असून या अभयारण्याला जोडून स्कूबा डायव्हिंग, डॉल्फीन दर्शन यासारख्या सोयी केल्या. 1986 साली स्थापना झालेल्या रायगड जिल्ह्यातील ‘फणसाड’ अभयारण्य शेकडो प्राणी व पक्ष्यांचे आश्रयस्थान असून या परिसरात 16 प्रकारचे उभयचर प्राणी, 200 प्रकारचे पक्षी,17 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 47 प्रकारचे कीटक,27 प्रकारचे अन्य छोटे जीव आढळून येतात.
पांढऱ्या पोटाचे गिधाड हा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी इथं आढळून येतो. तर भारतीय मोठी खार (शेकरू), भेकरे, गौर, (गवे) अस्वले, मुंग्याखाऊ, सांबरे, शालजीवे, अजगर, फुरसे व तत्सम साप यांचे हे माहेरघर आहे. पाकोळी व अतिशय छोट्या आकाराचे पाठीवर खारीप्रमाणे पट्ट असणारे दुर्मीळ हरीण याच परिसरात आढळून येते. मुरुड व अलिबाग येथून जाता येतं.
पालगड (ठाणे) जवळचं ‘तानसा’ अभयारण्यसुद्धा अशाच विविध दुर्मीळ प्राणी व पक्षी यासाठी ओळखले जाते. विविध प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असलेली इथली वनराई अनेक प्राणी व पक्षांचे आश्रयस्थान आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणाऱ्या तानसा नदीच्या खोऱ्यात हे अभयारण्य विस्तारले आहे. मुंबईपासून केवळ 90 कि.मी. अंतरावरं असणारं हे अभयारण्य जैवविविधतेचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं.
या अभयारण्यात फिरण्यासाठी कोणतीही ‘एंट्री फी’नाही. 12 फेब्रु 1970 रोजी हे अभयारण्य घोषित झाले आहे. 2014 साली इथं छोट्या घुबडाची अतिशय दुर्मीळ अशी प्रजाती सापडली. इथं 54 प्रकारचे प्राणी व 200 प्रकारचे पक्षी आढळून येतात.
फणसाड व तानसा ही अभयारण्ये रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्ये आहेत. याशिवाय रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगर रांगांमधेही ‘राधानगरी’ व ‘तिलारी’ ही दोन अभयारण्ये आहेत. राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूरपासून जवळ असले तरी डोंगरमाथ्यावरून ते खाली रत्नागिरी जिल्ह्यात पसरले आहे.
राधानगरी हे गवे, बैल व बिबटे यासाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर राधानगरी धरण परिसरातील कोकणकड्यापासून ते डोंगर माथ्यावरचा विशाल भूभाग त्याने व्यापला आहे. कोल्हापूर रत्नागिरीतला व्याघ्र प्रकल्प याच क्षेत्रात येतो. अगदी कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या काळापासून हे अभयारण्य राखण्यात आले असून त्या काळात इथे प्राण्यांची शिकारही चालत असे. या अभयारण्याची स्थापना 1958 साली अधिकृत केली गेली.
हे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत वन्यजीव अभयारय आहे. गवारेड्यांसाठी तसेच गवू बैलांसाठी हे प्रमुख अभयारण्य आहे. इथे 234 प्रकारचे पक्षी आढळून येतात. याला दाजीपूरचे अभयारण्य म्हणूनही ओळखतात. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे हे प्रमुख केंद्र मानले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे प्रमुख अभयारण्य आहे. कोकणातील अभयारण्यांचा विचार करताना ही अभयारण्ये जैवविविधतेचा विचार करता अतिशय मूल्यवान आहेत. त्यामुळेच ही अभयारण्ये वन्यजीव (प्राणी, पक्षी) अभ्यासकांसाठी फार मोलाची ठरली आहेत.