Maharashtra Farmers Death
दिलीप शिंदे
ठाणे : देशात सर्वाधिक शेतकऱ्यांचे जीवन संपविण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. एनआरबीच्या अहवालानुसार, 2024 मध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी सात प्रमाणे वर्षभरात 2,706 जणांनी जीवन संपविले. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी जीवन संपविण्याची स्थिती चिंताजनक आहे. बीड, अकोला, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील शेतकरी कर्जाच्या वसुलीसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून जीवन संपवितात. हे प्रमाण 2025 मध्ये देखील कायम आहे. गेल्या आठ महिन्यांत 1 हजार 183 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. तथापि, आता कोकणातही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. आतापर्यंत दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
भारतात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांपैकी 60 टक्के आत्महत्या ह्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील आहेत. देशभरातील 38 टक्के आत्महत्या या महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये बहुतांशी आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या आहेत. 2025 च्या अहवालात आता ठाणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नोंद होईल. हवामान बदल, ओला-कोरडा दुष्काळ, भात शेती खराब होणे, आंब्याचे पीक हातून जाणे किंवा कर्जबाजारीपणामुळे बहुतांश शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने देखील कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली. तसा अहवाल मुरबाड तहसीलदारांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. कोकणातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या ठरली.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारकडून एक लाखाची आर्थिक मदत मिळते. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतगर्त सर्व गरजू शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना, आरोग्य सुविधा, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे, मनरेगाची कामे, शेती विकासांतर्गत शासनाच्या विविध विभागामार्फत योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो.
मुरबाड तालुक्यातील धसईजवळील जायगाव येथील रमेश गणपत देसले या 52 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. परतीच्या पावसामुळे भाताचे पीक गेल्याने कर्ज कसे फेडायचे हा मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्या शेतकऱ्यावर सोसायटीकडून घेतलेले 1 लाख 58 हजारांचे कर्ज थकीत आहे. याबाबतचा अहवाल आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक लाखांच्या आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. यापूर्वी 30 डिसेंबर 2016 रोजी भिवंडी तालुक्यातील मालबीडी गावातील गौरू भागा शेलार या शेतकऱ्याने कीटकनाशके घेऊन आत्महत्या केली होती.
कर्ज वसुलीसाठी सावकार तसेच बँकांचा ससेमिरा सुरू होतो आणि त्या निराशेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र राज्यात आहे. कोकणात मात्र शेतकरी आत्महत्या करीत नसल्याचे सकारात्मक चित्र आहे. कर्ज काढून शेती करण्याचे, लग्न लावण्याचे प्रमाण नगण्य असल्याने अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेली तरी कोकणी शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाहीत. तो जोमाने पुन्हा कामाला लागतो व प्रामाणिकपणे काढलेले कर्ज वेळेत चुकता करतो. असे सकारात्मक चित्र कोकणात असतानाही ठाणे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची गेल्या नऊ वर्षांत दुसरी घटना घडली.