ठाणे : विधानसभा निवडणुकीचे मंगळवार (दि.15) पासून बिगुल वाजल्याने सर्व राजकीय पक्षांसह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या ठाण्यात सुमारे 71 लाख मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपले प्रतिनिधी म्हणून 18 आमदारांना विधानसभेत पाठवतील. विद्यमान 18 आमदारांपैकी 17 आमदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाईल.
ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ असून या मतदार संघात नवीन मतदारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांचा भरणा ही लक्षणीय आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघाच्या यादीमध्ये 38 लाख पुरूष आणि 33 लाख स्त्री व 1 हजार 387 इतर असे मिळून एकूण 71 लाख मतदार आहेत. दुबार मतदारांवरील कारवाईनंतर जिल्हा निवडणूक अधिकाररांकडून मतदारांची अधिकृत संख्या जाहीर होईल. मुख्यमंत्री ठरविण्याची ताकद असलेल्या ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतिहास घडविला आणि ठाणे हे राज्यातील राजकारणाचे केंद्र बनवले.
ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदार संघ असून सर्वात आमदार हे भाजपचे आहेत. भाजपचे आठ आमदार असून शिवसेना शिंदे गटाचे पाच आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , अजित पवार गट, मनसे, समाजवादी पार्टी आणि अपक्ष अशी आमदारांची पक्षीय ताकद आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून वाद असले तरी ज्या जागा आता जिंकलेल्या आहेत, त्याच जागा त्या पक्षाला सोडल्या जाणार आहेत. उर्वरीत ठाणे ग्रामीण मतदार संघ, कळवा मुंब्रा मतदार संघावर शिवसेनेने दावा ठोकला असून आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मुंब्रा-कळवा मतदार संघ हवा असल्याने भिवंडी पूर्वची जागा भाजपाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे, बेलापूर, ऐरोली, मीरा भाईंदर, डोंबिवली, भिवंडी पश्चिम , मुरबाड, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या जागा भाजपाच्या निश्चित असून कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण ह्या मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शहापूर मतदार संघ आणि कळवा-मुंब्रा मतदार संघ सोडले जाईल.
ठाणे जिल्ह्यातील विद्यमान 17 आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असून भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे कारागृहात असल्याने कल्याण पूर्व मतदार संघात नवीन चेहर्याला संधी दिली जाणार आहे. त्या जागेकरिता इच्छुकांची भाऊ गर्दी असून भाजप तसेच शिवसेनेत बंडखोरी अटळ असल्याचे सद्याचे चित्र आहे.