भिवंडी: भिवंडी पालिका क्षेत्रातील जन्म मृत्यू नोंदणी विभागातील घोळ अजून ही सुरू असून मागील दहा महिन्यात दुरुस्तीच्या सबबीखाली शहरात सुमारे 1500 दाखले दिले गेले आहेत. यासोबत भिवंडीत 400 मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले ते ही बोगस असल्याचे आढळून आले आहे. हे सर्व मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
जन्म मृत्यू विभागातील अनागोदी कारभारा विरोधात राज्यभर रान उठवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी भिवंडी मुख्यालयास भेट देत जन्म मृत्यू विभाग कार्यालयातील कामाची झाडाझडती घेतली आहे. यावेळी त्यांच्या सोबत आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष रवी सावंत, गटनेता संतोष शेट्टी, पदाधिकारी श्याम अग्रवाल, शाम भोईर, ममता परमाणी, भावेश पाटील आदी उपस्थित होते.
या पाहणीत भिवंडी पालिका क्षेत्रात जन्म मृत्यू नोंदणी साठी एकाच वेळी दोन सिस्टीम सुरू आहेत. ही खळबळजनक बाब समोर आली आहे. बंद पडलेले जून सिस्टम सोबत नवे सिस्टम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिल्या नंतर ही अनियमितता सुरू असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली आहे.
त्यावेळी आयुक्तांनी ही अनियमितता मान्य केली असून एक महिन्यात चौकशी करून तथ्य समोर आणणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दोन्ही सिस्टम मधून दुरुस्तीच्या नावाखाली दहा महिन्यात सुमारे 1500 दाखले दिले गेले आहेत. यासोबत भिवंडीत 400 मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले ते ही बोगस असल्याचे आढळून आले आहे.
हे सर्व मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देत राज्यात मागील तीन वर्ष पाठपुरावा केल्या नंतर महाराष्ट्रात मागील दहा महिन्यात 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून 55 हून ही अधिक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. 42 शहरात 10 हजार नागरिकांना आरोपी बनवण्यात आले आहे. यामध्ये हळूहळू पारदर्शकता येत आहे याचे समाधान असल्याचे शेवटी किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.