किन्हवली : जून महिन्यात पावसाने दगा दिला असला तरी १ जुलैपासून दमदार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने किन्हवली परिसरात शेतीच्या कामांना गती आली आहे. किन्हवली, अल्याणी, चिखलगाव, शिरवंजे या भागात शुक्रवारी व काहींनी रविवारी 'सात' साजरी करून म्हणजेच शेतावरील देवांचे, ग्रामदेवतांचे पूजन करून लावणीच्या कामांना सुरुवात केली.
लांबलेल्या पावसामुळे पेरणी उशिरा करण्याची नामुष्की भात उत्पादक शेतकऱ्यांवर आली होती, तर काही ठिकाणी पेरलेल्या बियाणाला टँकरने पाणी द्यावे लागत होते. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेला तुरळक पाऊस व १ जुलैपासून सुरू झालेली संततधार यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लवकर पेरणी केलेली भातपिके तयार झाली असून किन्हवली, शिरवंजे, चिखलगाव, अल्याणी, सावरोली, बर्डेपाडा भागात मूठ खणनी व भात लावणीची कामे सुरू झाली आहेत. शुक्रवारी व काही गावांत रविवारी ग्रामदैवते, शेतावरील दैवते, निसर्ग दैवते यांची पूजा करून 'सात' हा पारंपरिक कार्यक्रम साजरा केला. तयार रोपांचे मूठ खणणे, शेताची वाही करणे, रोपांची लावणी करणे इत्यादी कामांना गती आली असून लावणीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.