विक्रमगड : जव्हार येथून भिवंडीच्या दिशेने एक ट्रक खैराचा चोरटा माल घेऊन पसार होणार असल्याची खबर वन विभागाला शुक्रवारी (दि.५) रोजी मिळाली होती. विक्रमगड व जव्हार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्रकला साखरे गावाच्या जवळ अडवून तपासणी केली असता त्यात खैराचे जवळपास सुमारे ५० ओंडके आढळून आले. ट्रकसह हा माल वनविभागाने ताब्यात घेतला असून विक्रमगड विक्री आगारात तो जमा करण्यात आला आहे.
वन विभाग नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून वृक्षांची मोठ्या प्रमाणात चोरटी तोड करून जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. मागील वर्षी वन विभागाच्या पाली येथील वखारीतून लाखो रुपयांचे खैराचे ओंडके चोरीस गेले होते. त्याआधी याच दस्तान डेपोतून लाकूड चोरीतील पकडलेले वाहन चोरीस गेले होते मात्र आत्तापर्यंत कोणतेही चोर हे पकडले गेले नाहीतच मात्र कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. जव्हार वन विभागात सध्या प्रचंड अनागोंदी कारभार सूरु असून चोरट्या वृक्षतोडीचा जणु सपाटा लावण्यात आला आहे.
जव्हार विभागात झालेल्या चोरीच्या घटनांवरून उप वनसंरक्षक चोरटी वृक्षतोड रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करून साग व खैरासारखी दुर्मिळ प्रजाती तसेच हिरवेगार जव्हार वाचवायचे असेल तर त्यांची तत्काळ उचलबांगडी करावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. जव्हार येथील चोरीच्या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी उपवनसंरक्षकांसह काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.