केडीएमसीच्या समाजविकास अधिकाऱ्यांनी तृतीय पंथीयांशी संवाद साधला. Pudhari Photo
ठाणे

तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'केडीएमसी'चे प्रयत्न

Thane News | केडीएमसीच्या समाजविकास अधिकाऱ्यांनी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने राज्य शासनाच्या तृतीयपंथीयांचे धोरण - 2024 ची अंमलबाजवणी करण्यासाठी तृतीय पंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी थेट तृतीय पंथीयांशी संवाद साधला आहे.

तृतीय पंथी समुदाय हा समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक मानला जातो. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी शनिवारी अस्मिता तृतीयपंथी संस्थेच्या कल्याण पूर्वेकडील कार्यालयाला समक्ष भेट देऊन तेथील तृतीयपंथीयांशी संवाद साधला. चर्चा करत असताना उपायुक्त जाधव यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समाजातील या दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणून मान-सन्मानाने जगण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत गुरू नीता केणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

तृतीय पंथीयांची प्रथम महापालिकेकडे नोंदणी करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकरिता प्रथमतः केडीएमसीच्या नाट्यगृहात किन्नर महोत्सव आयोजित केला जाईल. तृतीय पंथीयांचे बचत गट तयार करून त्यांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन उदरनिर्वाहासाठी मार्केट उपलब्ध करून त्यांच्या उपजीविकेसाठी महापालिकेमार्फत सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उपायुक्त संजय जाधव यांनी उपस्थित तृतीय पंथीयांना दिले. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड या स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी किन्नरांनी वेळ मागितली आहे. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच किन्नर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT