डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उल्हास नदीजवळच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्राच्या कच्चे (अशुध्द) आणि शुध्द पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम येत्या मंगळवारी (दि. 22) रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी 9 तासांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणार्या कल्याण आणि टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी दिली.
मोहिली येथील पाण्याच्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर (फ्लो मीटर) बसविण्याच्या काळात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने या कालावधीत जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणार्या कल्याण ग्रामीण विभाग, मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, शहाड आणि परिसरातील गावे. तसेच कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता परिसर आणि चिकनघर भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसर्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.उल्हास नदी किनारी असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्र येथील मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर (फ्लो मीटर) यापूर्वीच बसविण्यात आले आहेत. काही मीटर जुने झाले आहेत. काहीत बिघाड होतात. त्यामुळे ते वेळीच बदलण्याचे काम करावे लागते, असे पाणी पुरवठा दुरूस्तीचे काम करणार्या ठेकेदाराने सांगितले.
कल्याण पूर्वेत पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्या गोविंदवाडी वळण रस्त्यावरून गेल्या आहेत. या रस्त्यावर तबेल्यांच्या ठिकाणी मुख्य जलवाहिनीला नेहमीच छिद्र पाडून तबेलेवाले पाणी चोरून वापरतात. गेल्या महिन्यात या भागातील 41 चोरीच्या नळ जोडण्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत तोडण्यात आल्या.