कसारा ः शाम धुमाळ
कसारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठल्याने कसारा वासियांना सद्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून आता कसारा वासियांना आठवड्यातून एकदा दोन तास मिळणारे पाणी आता आठ ते दहा दिवसांनी फक्त एक तास मिळणार आहे.त्यामुळे हजारो नागरिकांवर पाण्यासाठी वंनवणं करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
कसारा गावाची लोकसंख्या 15 हजार होई पर्यत गावाला पाणी पुरवठा होईल या क्षमतेचा तलाव सन.1985. रोजी बांधण्यात आला त्या नंतर गावाची लोक संख्या ही झपाट्याने वाढत असल्यामुळे पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने शासन स्तरावर पाठपुरावा करीत 2021 मध्ये वाढीव पूरक पाणी पुरवठा योजने अंतर्गत जल जीवन मिशन मधून 15 कोटी चे तलावाची पातळी वाढवण्याचे काम करण्यात आले परंतु राजकीय वरद हस्त असलेल्या या ठेकेदाराच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे 15 कोटीची पाणी योजना डबघाईला गेली.
पाईप लाईन उखडणे, ठीक ठिकाणी पाणी गळती होणे यासंह तलावाची खोली, रुंदी वाढवताना नियम बाह्य काम केल्याने चार वर्षा पासून हजारो लिटर पाणी वाया गेले त्यामुळे आज मितीस पाण्याचे नियोजन करून पाणी वाटप केल्यानंतरही पाणी कपातीची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असून या कृत्रीम पाणी टंचाईला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
पाणी गळती व प्रशासनाने खासगी विकासकांना बांधकाम साठी दिलेले हजारो लिटर पाणी यामुळे अंदाजे 60 हजारावर लोकसंख्या असलेल्या कसारा शहरातील लोकांवर आज पाणी बाणी ची वेळ ओढवली असून तलावातील पाण्याने तळ गाठल्याने आज कसारा वासियांना आठ टे दहा दिवसानंतर फक्त एक तास पाणी पुरवठा ग्रामपंचायत प्रशासनाकडून केला जाणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात असलेल्या आहे.
लोकसंख्या लक्षात घेता तलावाची क्षमता कुचकामी. दरम्यान कसारा गावाची लोकसंख्या लक्षात घेता साधता पाणी पुरवठा करणारा तलाव हा कुचकामी ठरत असून कसारा साठी अजून एक तलावाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे .मृत विहिरी, झिरे यांची दुरुस्ती करणे गरजेचे.
दरम्यान कसारा परिसरात 3 विहिरी व 2 झिरे आहेत परंतु आता पर्यत त्या पाण्याचा कोणी वापर करीत नव्हते परंतु सध्याच्या आणीबाणीच्या काळात लोक त्या विहिरीवर कपडे धुवायला जातं आहे. परंतु विहिरी व झिरे यांची साफसफाई करून त्यांना पुनर्जीवीत केल्यास ते पाणी दैनंदिन कामासाठी वापरण्यायोग्य होऊ शकते.
पाण्याचा व्यावसायिक वापर व नासाडी
दरम्यान तुटपुंज्या असलेल्या तलावातून अनेक व्यावसायिक पाणी वापरत असतात त्यातच खासगी विकासक असो किंवा रस्ते बनवणारे ठेकेदार हे याच तलावाचे पाणी वापरत असतात त्याच्यावर स्थानिक पातळीवर सत्ताधारी व विरोधक यांचा अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत गेली त्याच प्रमाणे तलावा सह पाईप लाईन ला होणारी गळती, नागरिकांकडून होणारी पाण्याची नासाडी यामुळे आज पहिल्यांदा कसारा वासियांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे.
फक्त 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा
दरम्यान कसारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सध्या स्थित फक्त 15 दिवस पाणी पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्यामुळे प्रशासनासाह स्थानिक ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे