नेवाळी : कल्याण-शिळफाटा मार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाला तडे गेल्याचे शनिवारी निदर्शनास आल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाच्या डोंबिवलीहून शिळफाटाकडे जाणाऱ्या लेनच्या डाव्या बाजूची फेन्सिंग अलाइनमेंट सरकल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून संबंधित लेनमधून वाहतूक तातडीने बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पुलाच्या कडेला तडे पडल्याचे तसेच संरक्षक फेन्सिंग मूळ जागेवरून हलल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एक लेन वाहतुकीसाठी बंद केली असली, तरी पुलाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात अवजड तसेच हलक्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाच्या स्थितीची सखोल तपासणी करून त्याच्या संरचनेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.