Kalyan Dombivli Metro Work Pudhari
ठाणे

Kalyan Metro: कल्याण मेट्रो वेगात; ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’अभावी प्रवास ठरणार कोंडीत?

बसफेऱ्या, रिक्षा सेवा आणि पार्किंग नियोजनाशिवाय मेट्रोचा पूर्ण लाभ मिळणार का, नागरिकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहर : आकाशात उभ्या राहत असलेल्या मेट्रो मार्गिका आणि ‘सुपरफास्ट’ प्रवासाची रंगवली जाणारी स्वप्ने यामुळे कल्याण परिसरात विकासाचे नवे चित्र आकार घेत आहे. मात्र घरापासून स्थानकापर्यंत पोहोचताना अपुऱ्या बसफेऱ्या आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कल्याण परिसरातील मेट्रो प्रकल्प हा स्थानिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देणारा मानला जात आहे. मार्गिकांचे काम वेगाने सुरू असून स्थानकांची उभारणी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. औद्योगिक तसेच निवासी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि तळोजा परिसरासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

तथापि, मेट्रोच्या मुख्य मार्गिकांसोबत स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’बाबत ठोस आराखडा अद्याप स्पष्ट नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी काही भागांत अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या बसफेऱ्या, अनियमित रिक्षा सेवा आणि पार्किंग सुविधेचा अभाव जाणवत आहे. या समस्या कायम राहिल्यास मेट्रोचा अपेक्षित लाभ मर्यादित राहू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, “मेट्रो ही मुख्य धमन्यासारखी असते; परंतु बस, रिक्षा, मिनीबस आणि सायकल ट्रॅक या तिच्या केशवाहिन्या असतात. या केशवाहिन्यांचे जाळे सक्षम नसेल, तर प्रवासाचा प्रवाह सुरळीत राहू शकत नाही.”

दररोज हजारो नागरिक रोजगारासाठी मुंबई व नवी मुंबईकडे प्रवास करतात. मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकाजवळ नियोजित बस टर्मिनस, मल्टिलेव्हल पार्किंग, सायकल स्टँड आणि रिक्षांसाठी स्वतंत्र झोन उभारण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

धोरण आखण्याची आवश्यकता

स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन आणि परिवहन यंत्रणांमध्ये समन्वय साधून एकात्मिक परिवहन धोरण आखण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. “मेट्रो प्रकल्प हा केवळ वेगाचा नव्हे, तर शाश्वत शहरी नियोजनाचा भाग आहे,” असे शहरी अभ्यासकांचे मत आहे.

मेट्रोच्या धावत्या रुळांसोबत अंतर्गत रस्ते, फीडर बस सेवा आणि शिस्तबद्ध स्थानिक वाहतूक व्यवस्था उभारली गेली तरच या पट्ट्यातील प्रवास खऱ्या अर्थाने सुसूत्र आणि गतिमान होईल. अन्यथा, उंच धावणाऱ्या मेट्रोखालील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचेच चित्र कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT