कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) हद्दीतील मोबाईल टॉवर कंपन्यांकडे मालमत्ता करापोटी तब्बल ६०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या तदर्थ समितीच्या सदस्यांनी मंत्रालयात धाव घेतली. समितीच्या सदस्यांनी राज्य शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांची भेट घेऊन या प्रकरणाची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच थकबाकी वसुलीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची माहिती समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली.
तदर्थ समितीच्या सर्व सदस्यांसह मंत्रालयात जाऊन सचिव वीरेंद्र सिंह यांची भेट घेण्यात आली. यावेळी मोबाईल टॉवर कंपन्यांकडील प्रलंबित थकबाकी कायदेशीर, प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कशी वसूल करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने मोबाईल टॉवर कंपन्यांकडील थकबाकीची वसुली अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
यावेळी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह सदस्य निलेश शिंदे, गणेश जाधव, सचिन पोटे, दर्शना काळे, किरण भांगले, संदेश पाटील, शशिकांत कांबळे, मंदार हळबे, खुशबू चौधरी, अमित धाकस, उमेश बोरगांवकर, कांचन कुलकर्णी तसेच अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि सचिव किशोर शेळके उपस्थित होते.
महापालिकेच्या हक्काची मोबाईल टॉवरची थकबाकी वसूल करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तदर्थ समितीचा मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे, असे सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.