डोंबिवली: मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा ब्लॉकचे संकट उभे ठाकले आहे.
टिटवाळा रेल्वे स्थानकातील फलाट विस्तारीकरण आणि १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष ब्लॉकचा दुसरा टप्पा बुधवारी २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या ब्लॉकमुळे कल्याण-कसारा मार्गावरील टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा परिसरातील हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होणार आहे. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि वीज ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात टिटवाळा-कसारा मार्गावरील लोकल सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहे.
काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या ठाणे किंवा कल्याणपर्यंतच धावणार आहेत. काही लोकलचे सुटण्याचे ठिकाणही बदलण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा आणि पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष नियोजन करावे लागणार आहे.
कल्याण-कसारा रेल्वे मार्ग हा मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा काही तासांसाठीही विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या कामाच्या वेळेवर आणि कुटुंबाच्या नियोजनावर होतो.
विकासकामे आवश्यक असली तरी ब्लॉकच्या काळात प्रवाशांना कमीतकमी त्रास व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने अधिक चांगले नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
ब्लॉकमुळे सीएसएमटी-टिटवाळा, सीएसएमटी-कसारा, ठाणे-टिटवाळा, टिटवाळा-सीएसएमटी यांसह विविध मार्गांवरील लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. टिटवाळ्याकडे जाणाऱ्या काही लोकल आसनगावपर्यंत वाढविण्यात येणार असून टिटवाळ्याहून सुटणाऱ्या काही लोकल आसनगावहून सुटणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका
या ब्लॉकचा परिणाम केवळ लोकलवरच नाही तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही होणार आहे. काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या मार्गात थांबवून ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे नवे वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा.
१५ डब्यांच्या लोकलसाठी सुविधा
टिटवाळा स्थानकातील फलाट विस्तारी करणाचे काम पूर्ण झाल्यावर १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. वाढती प्रवासी संख्या पाहता हे काम महत्त्वाचे आहे. विकासकामांदरम्यान प्रवाशांचा खोळंबा कमीतकमी रहावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने वाहतूक नियोजन, पर्यायी सेवा आणि प्रवाशांना वेळेवर माहिती देण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.