गोवेली/आसनगाव: ठाणे जिल्ह्यात गेले ३-४ दिवस संततधार पाऊस पडत असल्याने कल्याण तालुक्यातील नदी, नाले, ओहळ, भातशेती पावसाच्या पाण्याने भरून वाहत आहेत. वाहत्या पाण्याच्या विरूद्ध दिशेने मासे गाभोळी सोडण्यासाठी चढत असतात. गाभोळी मासे पकडण्यासाठी कल्याण तालुक्यात शेकडो नागरिकांची झुंबड पाहावयास मिळत आहे.
कल्याण तालुक्यात तीन-चार दिवस संततधार पाऊस चालू असल्याने नदी, ओढे, नाले, पावसाच्या पाण्याने भरून वाहत आहेत. कल्याण तालुक्यातून भातसा, काळू, उल्हास नदी वाहत असून या नद्यांमधील असलेले मासे पावसाळ्यात आपली गाभोळी सोडण्यासाठी ओढे, नाले, शेतामध्ये येत असतात.
गाभोळी भरलेले मासे व चिंभोरी खाण्यासाठी रूचकर लागतात. विणलेले पाग्यांर व विविध साधने घेऊन मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड पाहावयास मिळत आहे. वर्षातून एकदाच गाभोळी भरलेले मासे मिळत असल्याने या माशांची चव वेगळीच लागत असल्याने मासे घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने दिसत आहेत. या मोसमामध्ये नागरिकांना व आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत आहे. मासे ४०० ते २०० रुपये तर चिंभोरी ६०० रुपये तर मुंठे २०० रुपये दराने विकले जात आहेत.
मुसळधार पावसात शहापूर बाजारपेठेत खवय्यांची गर्दी
शहापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी राजा सुखावला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहापूर बाजारपेठेत काळे खेकडे, सफेद खेकडे (मुठे) तसेच पावसाच्या सुरुवातीला नदी क्षेत्र व धरण क्षेत्रात मिळणाऱ्या वळगणीच्या माशांना खवय्यांनी पसंती दर्शविली आहे. शिवाय रानभाज्या शेवाळे, बापळी, तेलपट, माठ, कुरुडूसारख्या भाज्यांना वारकरी मंडळींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आदिवासी बांधव काळे खेकडे, सफेद खेकडे, मासे पकडून बाजारपेठेत विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात.