कल्याण: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. आईच्या प्रसंगावधानामुळे मुलीचा जीव वाचला असून तिच्यावर सध्या मुंबईतील शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण पूर्व येथील खडेगोळवली परिसरात राहणारे विलास दिनकर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. पतीच्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मी ही आपल्या अडीच वर्षांची मुलगी अदितीला घेऊन माहेरी मध्यप्रदेशला गेली होती.
लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, विलास दिनकर तिच्या माहेरी जाऊन गुपचूप मुलगी अदितीला सोबत घेऊन कल्याणला परत आला. सुमारे 20 दिवस तो मुलीसह बेपत्ता होता. या दरम्यान लक्ष्मी हीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संपूर्ण घटना सांगितली होती. गुरुवारी सकाळी विलासने चिमुकली अदितीवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
लक्ष्मीने तत्काळ बचाव करून मुलीला वाचवले. गंभीर जखमी अवस्थेत मुलगी अदितीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी पिता विलास दिनकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.