डोंबिवली: ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश या दिवशी दिला जातो. मात्र कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीमुळे अस्तित्वातील वृक्षांचे संरक्षण हा मुद्दा चर्चेत आला आहे.
रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि सार्वजनिक सुविधांसाठी विविध प्रकल्प राबविले जातात. विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वृक्षतोडीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बाधित वृक्ष तोडण्यास परवानगी दिली जाते. मात्र परवानगीच्या अटी, वृक्ष प्राधिकरणाचे निकष आणि पर्यावरणीय नियमांचे पालन होते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथे नवीन रस्त्याच्या कामादरम्यान वृक्षतोड झाली. स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार अज्ञात व्यक्तीविरोधात आणि अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविण्यात आली.
कल्याणमधील बुद्धभूमी फाऊंडेशन परिसरात उड्डाणपूल प्रकल्पासाठी सुमारे ४० झाडे तोडल्याचा आरोप भन्ते गौरम रत्न यांनी केला आहे. या वृक्षतोडीसाठी परवानगी होती का ? वृक्ष प्राधिकरणाने पाहणी केली होती का ? पर्यायी वृक्षारोपणाचा आराखडा होता का ? आदी प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी माहिती मागवली जात आहे.
एक प्रौढ वृक्ष तयार होण्यास अनेक वर्षे लागतात. तो पक्षी, कीटकांना आश्रय देतो, तापमान कमी करतो, हवा शुद्ध करतो आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवतो.
पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून मागणी होत आहे की, प्रत्येक वृक्षतोडीची परवानगी, कारणे, तोडलेल्या वृक्षांची संख्या व बदल्यात केलेले वृक्षारोपण याची माहिती सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध करावी. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची यंत्रणा असावी. पर्यावरण दिनाचा संदेश ‘झाडे लावा’ याच सोबतच ‘अस्तित्वातील झाडे वाचवा’ हाही असल्याचे सांगितले जात आहे.
माणूसच उठला मुळावर...
जीवघेण्या प्रदूषण समस्येवर उपायोजना म्हणून ऑक्सिजन देणारी झाडे डोंबिवलीच्या निवासी विभागातील रहिवाशांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लावली आहेत. वड, पिंपळ, बदाम, आंबा, नागकेसर, शिसम, चेरी, पेरू, उंबर, फणस, बहावा, करंज, कडूनिंब, बकुळ, चिंच, आदी विविध प्रकारच्या या झाडांनी आता महाकाय वृक्षांचे स्वरूप धारण केले आहे.
याच एमआयडीसीच्या निवासी विभागात पोपट, साळुंक्या, चिमण्या, भारद्वाज, लवबर्ड, इत्यादी अनेक प्रकारच्या पक्षांचे अस्तित्व दिसून येते. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील वृक्षवल्ली आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. काही बेजबाबदारांकडून वृक्षवल्लीला धोका निर्माण झाला आहे. झाडांखाली कचरा जाळला जात आहे.