डोंबिवली: कल्याण जवळच्या गांधारी-वडवली या नवीन रिंग रोडवर रात्रीच्या सुमारास होणारी कार रेसिंग आणि जीवघेण्या स्टंटबाजीमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली उड्डाण पुलावर दुचाकीवरून स्टंटबाजी करणाऱ्या तिघा टपोरींची धरपकड करण्यात आली आहे. एकीकडे पोलिस वारंवार कारवाया जरी करत असले तरी काही दिवसांनी टपोरी पुन्हा आपल्या वाहनांवर स्वार होऊन स्टंटबाजी करतात. त्यामुळे अशा स्टंटबाजांना आवरणात पोलिसांची दमछाक होत आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याणच्या गांधारी-वडवली नवीन रिंग रोडवर सायकलिंग करताना कल्याणमधील नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असलेल्या अल्पवयीन कार चालकासह त्याच्या आईच्या विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली.
ही घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली उड्डाण पुलावर दुचाकीवरून स्टंटबाजी करणाऱ्या गणेश राजू फोंडारेड्डी (22), कबीर मच्छिंद्र नेतकर (20) आणि यश नितेश मालवणकर (23) या पश्चिम डोंबिवलीतील ठाकूरवाडी आणि टेल्कोसवाडी परिसरात राहणाऱ्या स्टंटबहाद्दरांवर विष्णूनगर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली.
पश्चिमेतील उल्हास खाडीवर असलेल्या पुलावर ॲक्टिव्हा स्कूटरवर बसून जीवघेणी स्टंटबाजी करत स्वतःसह अन्य दुचाकीस्वार, इतर वाहनचालक, तसेच प्रवाशांसह पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण केल्याचा या तिघा तरूणांवर वहिम आहे. पोलिसांनी स्कूटर देखिल जप्त केली आहे. यापूर्वी देखील पुलावर दुचाक्या आणि कारद्वारे जीवघेण्या स्टंटबाज्या करून त्याच्या रील समाज माध्यमांवर व्हायरल केल्या जात होत्या.
कल्याण जवळच्या गांधारी-वडवली या नवीन रिंग रोडवर रात्रीच्या सुमारास जीवघेण्या स्टंटबाज्या चालत असतात. अशा स्टंटबहाद्दरांना आवरण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलिसांनी या दोन्ही परिसरात गस्ती घालून स्टंटबहाद्दरांना प्रतिबंध तर करावाच, शिवाय त्यांच्या पालकांनाही समज देण्यात यावी, अशीही अपेक्षा पादचारी, वाहनचालक आणि प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
थरारक कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
उल्हास खाडीवरील मोठगाव-माणकोली उड्डाण पुलावर जवळपास 1200 मीटर लांबीचा सरळ चार पदरी मार्ग आहे. डोंबिवलीतून मुंबई/ठाण्याकडे आणि ठाण्याकडून डोंबिवलीत होणारी बहुतांशी वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे प्रवासी या मार्गाला पसंती देतात.
याच उड्डाण पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे भरधाव वेगात वाहने दुचाकीस्वार वेगाने पुलाच्या कठड्याला धडकून खाडीत पडले तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठगाव-माणकोली उड्डाण पुलासह कल्याणच्या गांधारी-वडवली या नवीन रिंग रोडवर कुणीही थरारक कृती करून वाहन चालविले तर त्या चालकावर कठोर कायदेशीर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.