डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बेतुरकरपाडा परिसरातून आजीसाठी औषध खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ही विद्यार्थिनी मंगळवारी आजीच्या औषधासाठी म्हणून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी घाबरून नातेवाईक आणि मैत्रिणींकडे चौकशी केली. तरीही तिचा कोणताही मागमूस न लागल्याने अखेर बाजारपेठ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कल्याण परिसरात अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या टोळीच्या चर्चेने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या घटनेचा तपास सर्व बाजूंनी सुरू केला असून 'सीसीटीव्ही' फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलींच्या सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.