काळू नदी गुदमरतेय जलपर्णीच्या विळख्यात  pudhari photo
ठाणे

Kalu River pollution : काळू नदी गुदमरतेय जलपर्णीच्या विळख्यात

प्रवाह ठप्प झाल्याने पुराचा धोका; जलचरांचे अस्तित्व धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : वासुंदरी आणि मांडा गावामधून वाहणारी काळू नदी सध्या भीषण जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. मांडा-टिटवाळा पश्चिमेकडील वासुंदरी रोड मार्गावरून पुढे वासुंदरी गावाकडे जाणाऱ्या पुलाजवळ नदीचे पात्र पूर्णपणे हिरव्या जलपर्णीने झाकले गेले असून नदीचा नैसर्गिक प्रवाह जवळपास ठप्प झाला आहे. हे दृश्य केवळ विदारकच नव्हे तर धोक्याची घंटा ठरले आहे.

काळू नदी हा या परिसराचा जीवनवाहिनी मानला जाणारा नैसर्गिक जलस्रोत आहे. शेतीसाठी, भूजल पुनर्भरणासाठी आणि नैसर्गिक निचऱ्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अनियंत्रित सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि जैविक कचरा थेट नदीत मिसळल्याने जलपर्णी झपाट्याने वाढली आहे. सध्या नदीवर हिरव्या चादरीसारखी दाट जलपर्णी पसरल्याने पाण्याचा मोकळा प्रवाह दिसेनासा झाला आहे.

महाकालेश्वर शिवमंदिराशेजारी वाहणाऱ्या नदीतील जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मासे आणि इतर जलचर जीव धोक्यात आले आहेत. शिवाय पाणी साचून राहिल्याने डासांची पैदास वाढली असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

नदीकाठच्या वस्त्यांमध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, पावसाळ्यापूर्वी नदी पात्र साफ न केल्यास जलपर्णीमुळे निचरा अडथळला जाऊन पूरस्थिती निर्माण होऊ शकते. काही ठिकाणी तर जलपर्णीने नदीचे पात्र बुजल्यासारखे झाले आहे. थोडा जरी जास्त पाऊस झाला तरी पाणी शेतात आणि वस्त्यांमध्ये घुसण्याची भीती व्यक्त होत आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नदीत सोडले जाणारे सांडपाणी, प्लास्टिक व अविघटनशील कचरा आणि स्वच्छतेअभावी वाढलेले प्रदूषण ही जलपर्णी वाढीची प्रमुख कारणे आहेत. केवळ जलपर्णी काढणे हा तात्पुरता उपाय असून सांडपाणी रोखणे, नियमित स्वच्छता आणि जैविक उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे.

पर्यावरणीय संकटाची चाहुल

वासुंदरी व मांडा ग्रामस्थ, स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे तातडीने जलपर्णी निर्मूलन मोहीम राबवण्याची जोरदार मागणी केली आहे. वेळीच कारवाई न झाल्यास येत्या काळात ही समस्या संपूर्ण परिसरासाठी मोठे पर्यावरणीय संकट ठरू शकते.

जलपर्णी काढण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे...

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (कल्याण) प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, “वाहत्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि ऊन वाढले की जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढते. ती काढण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे.” उल्हास नदीतील जलपर्णीबाबत आपण महापालिकेला पत्र दिले असून काळू नदीबाबतही तत्काळ पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पर्यावरण मित्र ‌‘अंघोळीची गोळी‌’ संस्थेचे अविनाश पाटील यांनी इशारा दिला की, “अतिप्रदूषित पाण्यात जलपर्णी झपाट्याने वाढते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन जलचर मरतात, डासांची पैदास वाढते आणि पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे संबंधित विभागाने नद्या-तलावांतील जलपर्णी काढण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT