अभिनेता सैफ अली खान. File Photo
ठाणे

नोकरीही गेली, छोकरीही गेली, बदनामीही झाली!

Saif Ali Khan attack case | सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेला तरुण मानसिक विवंचनेत , वडिलांचा दावा

पुढारी वृत्तसेवा
योगेश गोडे

सापाड : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुलाबा येथील रहिवासी आकाश कैलास कनोजिया (31) याला चुकून ताब्यात घेण्यात आले होते. चुकीच्या माहितीमुळे कनोजियाला अटक करण्यात आली होती, ज्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली आणि नियोजित लग्न देखील रद्द झाले होते. त्याच्या अटकेचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले, ज्याचा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर नकारात्मक परिणाम झाला. सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी आकाश कनोजियाला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करून सोडले. परंतु, या घटनेमुळे आकाश मानसिक विवंचनेत असल्याचे वडिलांनी दै. पुढारीला सांगितले.

आकाश कनोजिया (31) याला 16 जानेवारीला सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून दुर्ग, छत्तीसगड येथून ताब्यात घेण्यात आले. 18 जानेवारी रोजी रेल्वे सुरक्षा दलाने त्याला ताब्यात घेतले होते. पण नंतर 19 जानेवारी रोजी सकाळी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास याला शेजारच्या ठाण्यातून अटक केली. त्यानंतर दुर्ग आरपीएफने आकाश कनोजियाची सुटका केली. मात्र टिटवाळ्यात राहणार्‍या आकाशच्या वडीलांनी दै. पुढारीशी बोलतांना मोठा खुलासा केला आहे.

घटनेच्या तिसर्‍या दिवशी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपी मोहम्मद शरीफुलला अटक केली. त्यापूर्वी रेल्वे पोलिसांनी संशयित म्हणून आकाश कनोजियाला ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याचे फोटो टीव्ही आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आले, ज्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली.

पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले. तो बेरोजगार झाला आहे. त्याच्या नववधूने त्याला नाकारले आहे आणि कुटुंबाची बदनामी होत आहे. मुंबई पोलीस, सैफ अली खानने आमचे कुटुंब देशोधडीला लावले आहे. मुंबई पोलिसांनी हा तोच आरोपी आहे का? याची खातरजमा करायला पाहिजे होती. माझ्या मुलासोबत जे घडलं ते चुकीचे आहे. या घटनेचा, पोलिसांच्या वागण्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला आहे. कामात त्याचे मन लागत नाही, तो मानसिक विवंचनेत आहे. तो आमच्याशी सुद्धा नीट बोलत नाही. अनेक जण हेच सांगत होते की, फोटोमधील व्यक्ती आणि माझ्या मुलात कुठेच साधर्म्य नाही. असं म्हणत आकाशच्या वडिलांनी त्यांचा संताप व्यक्त केला. त्यांची ही कैफियत आता कोण ऐकणार का? आकाशचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य कधी सुरळीत होणार? असा प्रश्न आकाशचे वडील कैलाश कनोजिया यांनी दै. पुढारीशी बोलताना केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT