ठाणे

जितेंद्र आव्हाड परमार प्रकरणात अडकणार होते : आनंद परांजपे

मोहन कारंडे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : "सुरज परमार प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होता? अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात? वैभव कदम प्रकरणात जबाबदार कोण? डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी," असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत देत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सुरज परमार या विकासकाच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठामपा विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली तेव्हा डॉ. जितेंद्र आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होता? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होता? हे एकदा जाहीर करा. अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी मी आपणांस ५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८ वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करु नका. कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलीसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करुन बालिशपणा दाखविलात आणि पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत याचे उत्तर द्या. वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाने जीवन संपवले व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण? या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी. अजितदादा व धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात रहातोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारु शकतो, हे लक्षात ठेवा, असा इशाराही परांजपे यांनी आव्हाड यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. त्याला प्रत्युत्तर देताना परांजपे यांनी आव्हाड यांना आव्हान देत पलटवार केला. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वप्रथम माझ्या नेतृत्वाखाली ठाण्यात व बॅलॉर्ड इस्टेट व यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करण्यात आले होते. अजितदादा नेहमीच खरे बोलतात यामुळे त्यांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT