ठाणे : वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका कष्टकरी व मध्यमवर्गीयांच्या पोळी-भाजी केंद्रांना बसला आहे. साधी थाळी 70-80 वरून थेट 90-110 वर पोहोचली आहे. पोळी-भाकरी गव्हाचे दर वाढल्याने 8 ची पोळी आता 10 ते 12 रु. झाली आहे, तर भाकरी 25 पर्यंत महागली आहे.
कमर्शियल सिलिंडरचा तुटवडा आणि ग्रेव्हीसाठी लागणारे कांदा-टोमॅटो महागल्याने हॉटेलमधील भाज्यांचे दर 15 टक्क्यांनी वाढले आहेत. भाजीपाला कडाडला आहे. वाहतूकदारांनी डिझेल दरवाढीचे संकेत देत भाड्यात 10 ते 15 टक्के वाढ केली आहे. वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या ट्रकची संख्या 15 टक्क्यांनी घटल्याने किरकोळ बाजारात किमती वाढल्या आहेत. मासेमारी बोटींचा डिझेल खर्च वाढल्याने मासळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. तसेच आंबा व टरबूज यांसारखी फळेही 10 टक्क्यांनी महागली आहेत.
मध्य-पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या आहेत. याचे थेट पडसाद आता ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. इंधन टंचाईच्या, लॉकडाऊनच्या अफवा आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, भाजीपाल्यापासून ते हॉटेलच्या थाळीपर्यंत सर्वच वस्तू 10 ते 15 टक्क्यांनी महागल्या आहेत.
युद्धामुळे इंधन टंचाईला नियंत्रित कर यासाठी पुन्हा लॉक डाऊन लागणार, इंधन संपले आहे अशा नाना अफवांचे पेव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा येथे गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.