गणेशमुर्ती- गौरीचे विसर्जन करण्यास जात असलेले भाविक Pudhari Photo
ठाणे

ठाणे : कल्याण-डोंबिवलीत 29 हजार 501 हजार गौरी-गणेश मूर्तींचे विसर्जन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

संपुर्ण राज्यभर गुरुवारी (दि.12) घरगुती गणेशमुर्ती-गौरी विसर्जन करण्यात आले. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत कल्याण-डोंबिवलीतील गौरींसह गणेशाचे विसर्जन निर्विघ्न आणि शांततामय वातावरणात पार पडले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकूण 29 हजार 501 गौरी-गणपतींचे विधिवत पूजन केल्यानंतर विविध विसर्जनस्थळांवर मोठ्या भक्तिभावात विसर्जन करण्यात आले.

कल्याणच्या दुर्गांडी किल्ल्यानजीकचा गणेश घाट, काळा तलाव, गौरी पाडा तलाव, आधारवाडी जेल तलाव, तर डोंबिवलीमध्ये रेतीबंदर, गणेश घाट यासह खाडीजवळच्या गणेश घाट, अशा 68 विसर्जन स्थळांवर, तसेच 38 कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन पार पडले. 5 दिवसांच्या श्रीगणेश-गौरींचे विसर्जनाच्या दिवशी जवळपास 37.91 मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. गणेशोत्सव मंडळांनी देखील महापालिकेस सहकार्य करून उत्तम प्रतिसाद दिला. महापालिकेमार्फत गणेशोत्सव मंडळांकडून निर्माल्य संकलन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निर्माल्य रथांमार्फत (कल्याणमध्ये 2 आणि डोंबिवलीमध्ये 2 डंपर्स) 4.5 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. या कामासाठी विविध सामाजिक संस्थांचे केडीएमसीला सहकार्य लाभले.

निर्माल्यातून होणार खतनिर्मिती

संकलित केलेले हे निर्माल्य कल्याण जवळच्या उंबर्डेमधील बायोगॅस प्रकल्पात नेऊन त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. तर डोंबिवलीतील निर्माल्य हे श्री गणेश मंदिर संस्थानच्या खत निर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. विसर्जन स्थळांवर धुरीकरणाची व्यवस्था देखील महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. विसर्जनादरम्यान कोणतीही बाधा येऊ नये यासाठी केडीएमसीमार्फत विसर्जनस्थळी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख विसर्जनस्थळांवर महापालिकेचे प्रभागातील सहाय्यक आयुक्त, पोलिस, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, त्याचप्रमाणे वैद्यकीय पथक देखील उपलब्ध करून देण्यात आले होते.

महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अवधूत तावडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी रात्रीच्या सुमारास विसर्जनस्थळांसह विसर्जन व्यवस्थेची समक्ष पाहणी केली. भाविकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने योग्य ती व्यवस्था करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. संकलित केलेल्या निर्माल्याची आता शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जात असल्याने नदी व खाडीमध्ये हे निर्माल्य जाऊन जलस्त्रोत प्रदुषित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT