ठाणे : ठाणे शहरात जड अवजड वाहने सकाळी 7 ते 10 या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामध्ये सर्विस रोडचे सुद्धा विलीनीकरणाचे काम सुरू आहे.
घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा अशी मागणी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी व सेवा रस्ता विलीनीकरण याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पत्रामध्ये ठाणे शहराचे घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने होत असलेले शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे राहणारे नागरिक नोकरी निमित्त आपली खाजगी वाहने घेऊन घरा बाहेर पडत असतात.
अवजड वाहने सकाळी 7 ते 10 या वेळेत बंद राहण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहने सोडली जात आहेत. मात्र सततच्या होणार्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर पट्ट्यातील नागरिक तसेच खाजगी संस्था रस्त्यावर उतरत आहेत.
प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही
खड्ड्यांमुळे होणारे अपघात व वाहतूक कोंडी संदर्भात नागरीक आंदोलन छेडत असून याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी हायवे पूर्व दुती महामार्गावरील दोन्ही बाजूस सेवा रस्ता सर्विस रोड विकसित केले होते. ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होती त्यामध्ये चार ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्विस रोड महापालिकेला करता आला नाही.
आश्वासनांचे काय झाले?
सद्यस्थिती या सेवा रस्ता विलीन करण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मनेरा यांनी हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक घेण्याच्या आश्वासनांचे काय झाले, असा ही प्रश्न विचारे यांनी विचारला आहे.