भिवंडी : विसर्जन मिरवणुकीतील गणेशमूर्तीवर दगडफेक होताच गणेशभक्तांनी मिरवणूक थांबवली आणि रस्त्यातच ठिय्या मांडला. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. शहरात सध्या सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भिवंडीमधील वंजार पट्टी नाका येथे श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अशात व्यक्तीने दगडफेक केल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जमलेला गणेशभक्तांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले. जमावानेही केलेल्या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला. भिवंडीत मंगळवारी दुपारी तीनपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास सुंदर बेणी कंपाऊंड घुंगट नगर येथील श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात कंटकाने दगडफेक केल्याचा प्रकार घडला. संतप्त गणेशभक्तांनी मग रस्त्यातच ठाण मांडले व घो- षणा देण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजताच आमदार महेश चौघुले, आर. एस. एस. चे राजेश कुंटे, बजरंग दलाचे संदीप भगत, दादा गोसावी यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी पोहोचले.
काही जणांना जमावाकडून मारहाण देखील झाली. तोपर्यंत सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांसह पोलिस अधिकाऱ्यांचा ताफा अतिरिक्त पोलीस व दंगल नियंत्रण पथकासह दाखल झाला. शेवटी तणाव वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता भंग करणार्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून कुणीही शहरातील शांतता भंग करू नये असे आवाहन भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी नागरिकांना केले आहे.
तणावपूर्ण शांतता या पार्श्वभूमीवर बुधवारी कॉटर गेट मज्जिद येथून सुरू झालेल्या ईद-ए-मिलाद जुलुसमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही हुल्लडबाज तरुणांनी वाहनांची तोडफोड करून दोन ते तीन तरुणांना बेदम मारहाण केली. पोलिसांच्या हस्तक्षेपा नंतर तणाव निवळला.
गणेशमूर्तीवर झालेली दगडफेकीची घटना अतिशय निंदनीय असून भिवंडी शहरातील शांतता सुव्यवस्था व एकात्मता भंग करण्याचे कट कारस्थान काही विघ्न संतोषी लोक करत आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामान्य नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार सुरेश म्हात्रे यांनी केले आहे.
मंगळवारी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका राज्यात शांततेत पार पडल्या. मुंबई वगळता काही ठिकाणी मात्र दुर्दैवी घटनांचे गालबोट लागले. ध्वनीप्रदूषणाचा बळी या मिरवणुकीत जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, परभणीच्या जिंतूर शहरात विसर्जन मिरवणुकीत डिजेच्या कर्णकर्कशअ वाजाने एकाचा बळी घेतला.