ठाणे/पालघर : मच्छीमारीच्या चालू हंगामात राज्य मासा पापलेट मिळेनासे झाल्याने परदेशी निर्यात थांबणार आहे. रायगडला घोळ माशाची लॉटरी लागली. एका मच्छीमाराला या जॅक पॉटमधून ४ कोटी मिळाले. तर पालघरला सरंगा माशाची जास्त आवक होताना दिसत आहे. त्यामुळे पापलेटप्रेमी आता सरंग्याकडे वळले आहेत.
मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर परतल्या असून पहिल्या फेरीत राज्य माशाचा दर्जा असलेल्या पापलेटची आवक समाधानकारक राहिली आहे. मात्र मच्छीमारांना मिळालेल्या पापलेटपैकी अधिकतर मासे हे २०० ते ४०० ग्रॅम वजनाचे (मध्यम दर्जाचे) असल्याने सर्वाधिक उत्पन्न देणारा हा राज्य मासा आगामी हंगामात किती प्रमाणात व किती काळ उपलब्ध होईल, याबद्दल मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. १ जून ते ३१ जुलै दरम्यान राज्यात मासेमारी बंदी कालावधी पाळला जातो. त्यानंतर १ ऑगस्टच्या पहाटे निघालेल्या मासेमारी बोटी या दोन आठवड्यांनी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आपापल्या किनाऱ्यावर परतल्या आहेत. जिल्ह्यातील यंदा १८११ बोटीने मासेमारी परवाना घेतला असून त्यामध्ये सातपाटी व मुरबे गावातील २५० ते ३०० बोटींचा समावेश आहे.
पारंपरिक पद्धतीने राज्य मासा असलेल्या पापलेटची मासेमारी करताना प्रत्येक बोटीला किमान ४०० किलो तर इतर काही बोटींना १००० १२०० किलो पापलेट माशाचे उत्पादन मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे मासेमारीच्या पहिल्या फेरीने प्रत्येक बोटीला किमान साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे उत्पादन समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.
वजनाप्रमाणे सरंगा (पापलेट) माशाचे आकारमान ठरवले जात असून ५०० ग्रॅम पेक्षा अधिक वजनाच्या माशाला सुपर सरंगा असे संबोधले जाते. तर ४०० ते ४९९ ग्रॅमच्या पापलेटला सरंगा नंबर १ असे संबोधले जाते. यंदाच्या उत्पादनात ४०० ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे मिळालेले सुपर दर्जा व १ नंबर दर्जा पापलेटचे प्रमाण पाच टक्के इतके असून सुपर पापलेटचे प्रमाण अवघे एक टक्क्याच्या जवळपास असल्याचे मच्छीमाराच्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडून - मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. सध्या आवक झालेल्या पापलेट माशांचे आकारमान २०० ते २९९ ग्राम (सरंगा नंबर ३) व ३०० ते ३९९ ग्रॅम (सरंगा नंबर २) इतके असून या पकडला गेलेल्या माशाची काही प्रमाणात अधिक वाढ झाली असती तर पकडलेल्या माशांना अधिक दर मिळून उत्पादन किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती. त्याप्रमाणे पुढील हंगामासाठी अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात - प्रजनन होण्यास उपयुक्त ठरले असते असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.