ठाणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियान आणि महायुतीच्या विजयासाठी एक लाख शिवसैनिक रोज 15 कुटुंबांना भेटून दहा योजना समजावून सांगतील. त्याची सुरुवात आजपासून मी केली असून आठवडाभरात आम्ही एक कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच शासकीय योजनांवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादाची लढाई नसल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील एक कोटी घरांना देणार शिवसैनिक भेटी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियानाला सुरुवात
राज्य सरकारच्या 10 योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ मिळतो की नाही याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.10) ठाण्याच्या किसननगर भागातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वागळे इस्टेट भागातील 15 कुटुंबाची भेट घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना शासकीय योजनांची माहिती दिली. या अभियानादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून एकत्रित काम करत आहोत. तसेच महायुतीतील आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित कार्यक्रम राबवित आहोत. महायुतीमधील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते लाभार्थी वंचित राहू नये म्हणून चहूबाजूंनी काम करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेत राज्यातील 5 कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. या अभियानासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपमध्ये जिओ ट्रॅकिंग होणार आहे. या अॅपचा वापर कार्यकर्ते अभियाना दरम्यान करणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांनी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. या शिकवणीनुसारच शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर प्रत्येक शिवसैनिक या योजनेचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शासनाने घेतलेले निर्णय आणि आपण घेतलेले निर्णय लाडकी बहीण ही तर सुपरहिट तर झालीच, त्याचा लाभ लाडक्या बहिणी घेत आहेत. महाराष्ट्र आमचे कुटुंब, परिवार आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी आदेश देऊन नव्हे तर रस्त्यावरती उतरून स्वतः घरोघरी जात आहे. या योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः घरी जात आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
एक महिन्यात योजना आली आणि ती महिन्याभराच्या आत सुरू देखील झाली. आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या जलद गतीने काम झाले नव्हते ते आमच्या सरकारने करून दाखविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.