ठाणे : जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकता, तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब, मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलट पेपरवर झाली, यावर काय म्हणाल? असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांसह, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बेस्ट निवडणुकीवरून शिंदे यांनी उबाठाला हा टोला लगावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी बुधवारी शिवसेनेते प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. 80 जागा लढवून 60 जागा आम्ही जिंकलो. काहीजण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही पण आमचे 60 आमदार निवडून आले. ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. ते जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होते तेव्हा ईव्हीएम खराब, मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलट पेपरवर झाली होती, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी
मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीडब्रेकर काढून टाकले. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात 232 जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले, असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील अडीच वर्षात शेतकर्यांना महायुती सरकारने 45000 कोटींची मदत केली होती, आताही सरकार शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.