ठाणे : जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकत भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत चौथा क्रमांक पटकावला असून देश आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत आहे. ही बाब 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाची, आनंदाची आणि गौरवाची आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नववर्षाचे स्वागत करताना केले. तसेच बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त राज्यभरात आरोग्य शिबिरे भरविण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली.
स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर या उपक्रमात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केले. या उपक्रमात सहभागी झालेले सर्व रक्तदाते आणि डॉक्टरांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही ठाण्यात अव्याहतपणे सुरू असल्याचे सांगितले.
नवीन वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या मोठ्या विकासात्मक भेटीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “नाशिक ते अक्कलकोट ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग मंजूर झाला असून समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्पही महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो.” या निवडणुकीत महायुतीचाच भगवा बृहन्मुंबई महानगरपालिकांवर फडकणार आहे.
मुंबईकरांचा विकास, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित कारभारासाठी महायुतीला मोठे समर्थन मिळेल,” असे विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, हेमंत पवार, मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचाही उल्लेख करत ते म्हणाले, “बाळासाहेबांचा ‘80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ हा मंत्र आम्ही आचरणात आणत आहोत.