ठाणे: मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतूक आणि उड्डाणपूल या दोन्ही माध्यमांतून पर्यायी व्यवस्था उभारण्यावर भर दिला आहे. डोंबिवलीतून ठाणे, मिरा-भाईंदर, वसई तसेच नवी मुंबई विमानतळापर्यंत ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात असून डोंबिवलीतील मोठागाव जेट्टीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
दुसरीकडे, अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला मिरा-भाईंदरमधील 'बॉटलनेक' उड्डाणपूल अखेर रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
ठाणे आणि त्यापुढील उपनगरांतील प्रवाशांना लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीचा रोज सामना करावा लागतो. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित रेल्वे फेऱ्यांमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून जलवाहतुकीचा पर्याय विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी सागरी विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी डोंबिवलीतून जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वॉटर टॅक्सी हा जलद आणि सोयीस्कर पर्याय असल्याचे सांगत या प्रकल्पाला गती दिली आहे. डोंबिवली-ठाणे-मीरा भाईंदर-वसई आणि डोंबिवली-दिवा-नवी मुंबई विमानतळ असे दोन स्वतंत्र जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असलेली वॉटर टॅक्सी सेवा लवकरच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात डोंबिवली ते ठाणे गायमुख दरम्यान जलप्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.
नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे स्वतः प्रकल्पावर लक्ष ठेवून असून आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. तिकीटांचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.
सुधारणा पूर्ण होऊनही पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मनसेनेही पूल खुला करण्यासाठी प्रशासनाला इशारा दिला होता. अखेर रविवारी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, माजी महापौर डिंपल मेहता आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोणताही गाजावाजा न करता पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
७० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई आणि उपनगरांना जोडण्यासाठी १० हजार वॉटर टॅक्सी सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. या योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीपासून वसई-विरारपर्यंत जलवाहतूक जाळे उभारले जाणार आहे. या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या ७० मिनिटांत गाठणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ६,०६६ कोटी रुपयांच्या खर्चातून ३४०.६८ किलोमीटर जलमार्गाचे जाळे विकसित करण्याचे काम सुरू आहे. मिरा-भाईंदरमधील बहुचर्चित 'बॉटलनेक' उड्डाणपूलही अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. पुलाचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र चार पदरी मार्ग पुढे दोन पदरी होत असल्याने त्याची रचना सोशल मीडियावर 'बॉटलनेक' म्हणून व्हायरल झाली होती. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.