डोंबिवली : कारखान्यात पेस्ट कंट्रोल केल्यामुळे परिसरातील सात भटक्या कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या कारखाना मालक, त्याचा भाऊ आणि एका कामगाराच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार कुत्र्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पशूंच्या शासकीय रूग्णालयाकडे पाठवून दिले आहेत.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकलव्य ॲनिमल पेडीगिरी नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात कुत्र्यांसाठी डॉग फूड तयार केले जाते. विषाणू आणि कीटकांचा उपद्रव वाढल्यामुळे या कारखान्याचे मालक विरेंद्र कुमार निशाद यांनी काही दिवसांपूर्वी कारखान्यासह आजूबाजूच्या परिसरात पेस्ट कंट्रोल केले होते. याच दरम्यान परिसरातील सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील प्राणी मित्र सुचित्रा सुर्वे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.
या संदर्भात सुचित्रा सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारखाना मालक विरेंद्र कुमार निशाद, त्यांचा भाऊ आणि एका कामगाराने कारखान्यात उंदीर मारण्याचे औषध टाकल्याने ते औषध खाऊन परिसरातील भटक्या कुत्र्यांचे मृत्यू झाले. इतकेच नाही तर कारखाना मालक आणि त्यांच्या कामगारांनी आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप सुचित्रा सुर्वे यांनी केला आहे. एकीकडे मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मृत्यू पावलेल्या सात पैकी चार कुत्र्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पशूंच्या शासकीय रूग्णालयाकडे पाठवून दिले आहेत. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत ढोले अधिक तपास करत आहेत. कुत्र्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे अहवालातून स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेनंतर डोंबिवलीतील प्राणी मित्रांमध्ये एकच खळबळ माजली आहे.