BJP Workers Join MNS Dombivli
नेवाळी : "भाजपात गेलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना तिथे गेल्यानंतर पस्तावा होत आहे. यांत्रिक पद्धतीने काम करावे लागते, खोटे बोलण्यास भाग पाडले जाते आणि खोटे हिंदुत्व गळ्यात मारले जाते. त्यामुळे ते पुन्हा मनसेत परत येत आहेत," असा दावा मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी केला आहे. डोंबिवली आणि १४ गावांतील भाजपात गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या घरवापसीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
नुकतेच डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील १४ गावांमधील काही मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गुरुवारी राजू पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश करत घरवापसी केली आहे. यावेळी पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
राजू पाटील म्हणाले, "यापूर्वीही काही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते इतर पक्षात गेले होते. तरुण वयात क्षणिक भावनेतून किंवा काही आश्वासनांना भुलून काही जण पक्ष सोडत असतात. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना वास्तवाची जाणीव होते आणि पुन्हा मनसेत परतण्याचा निर्णय घेतात. आमच्या पक्षात काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. इतर पक्षात गेल्यावर त्यांना त्यांच्या मर्यादा समजतात." असं पाटील म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, "मनसेत परत येणाऱ्या कार्यकर्त्यांचे आम्ही मोठ्या मनाने स्वागत करतो. मात्र, आर्थिक व्यवहार किंवा पैशांच्या देवाणघेवाणीतून पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा प्रवेश दिला जात नाही. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना यंत्रणेप्रमाणे केवळ टास्क दिले जातात. स्वतंत्रपणे भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य नसते. खोट्या गोष्टी बोलायला सांगितले जाते, खोटे हिंदुत्व पुढे केले जाते. हे अनेक तरुणांना पटत नाही. त्यामुळे ते पुन्हा मनसेत परत येत आहेत."
या घरवापसीमुळे डोंबिवली आणि १४ गावांच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने भाजपवर केलेल्या या टीकेचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.